फोटो सौजन्य - Social Media
ब्रेम्बोच्या सहकार्याने इकोनॉमिस्ट एंटरप्राइजने केलेल्या नव्या संशोधनात रस्ते सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास आणि वाहतूक तज्ज्ञांचे मूल्यांकन यांच्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. ‘सेफ्टी इन मोशन: ड्रायव्हिंग ट्रस्ट इन मॉडर्न मोबिलिटी’ या अहवालात जगातील प्रमुख १० वाहन बाजारपेठांतील नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज
संशोधनानुसार, जगातील दहापैकी नऊ जणांना दैनंदिन प्रवासात स्वतःला सुरक्षित वाटते, मात्र केवळ ४५ टक्के वाहतूक तज्ज्ञच या मताशी सहमत आहेत. विशेष म्हणजे ब्राझील, चीन आणि भारतात ही तफावत सर्वाधिक असून, सुमारे ९४ टक्के नागरिकांना रस्ते सुरक्षित वाटत असले तरी केवळ १८ टक्के तज्ज्ञांनी त्याला दुजोरा दिला आहे. या देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संशोधनात अति-आत्मविश्वास हा रस्ते सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. वाहनांमधील आधुनिक ड्रायव्हर-असिस्टन्स तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर, त्याबद्दलचे अपुरे ज्ञान आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे चालक अनावश्यक जोखीम घेत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तब्बल ६५ टक्के तज्ज्ञांच्या मते, अशा तंत्रज्ञानाच्या जाहिराती त्याच्या क्षमतांचा अतिरंजित दावा करतात.
अहवालात सामाजिक आणि आर्थिक स्तरानुसारही सुरक्षिततेच्या भावनेत फरक दिसून आला आहे. कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास तुलनेने कमी असून, मिलेनियल्स सर्वाधिक आत्मविश्वासू असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दुसरीकडे, जेन-झेड आणि बेबी बूमर्समध्ये तुलनेने अधिक असुरक्षिततेची भावना दिसून आली.
Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
रस्ते सुरक्षित वाटत असले तरी ८८ टक्के नागरिकांनी कमी वेगमर्यादा, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि अधिक प्रभावी सुरक्षा उपायांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ६८ टक्के वाहतूक तज्ज्ञांच्या मते, नियामक संस्था आणि वाहन उद्योग यांच्यातील समन्वयाचा अभाव हा रस्ते सुरक्षेतील सुधारणांसमोरील सर्वात मोठा अडथळा आहे.
संशोधकांच्या मते, रस्ते सुरक्षेबाबतचा विश्वास केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर नव्हे, तर प्रभावी धोरणे, पारदर्शक नियमन, जनजागृती आणि जबाबदार नवोपक्रम यांवर आधारित असला पाहिजे. रस्ते सुरक्षेवरील विश्वास कमवावा लागतो, तो गृहीत धरून चालता येत नाही, असा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.






