गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!
अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चचा नवीन अहवाल नुकताच समोर आला. ज्यात अदानी समूह प्रकरणात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळणार आहे. शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आज (ता.११) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारला तीन मोठे प्रश्न विचारले आहेत.
गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “छोट्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक रकमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीने अध्यक्ष्यांवरील गंभीर आरोपांबाबत तडजोड केली जात आहे. देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारला महत्त्वाचे प्रश्न आहेत.” हिंडेनबर्ग अहवालामुळे सध्या शेअर बाजारात मोठी जोखीम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्नही त्यांनी यावेळी सरकारला केला आहे.
काय म्हटलंय राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये?
राहुल गांधींनी त्यांच्या एक्स पोस्टमधील व्हिडिओमध्ये तीन प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांनी कष्टाने कमवलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरणार? पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की गौतम अदानी? अत्यंत गंभीर आरोप समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा या प्रकरणाची स्वत:हून दखल घेणार का? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
The integrity of SEBI, the securities regulator entrusted with safeguarding the wealth of small retail investors, has been gravely compromised by the allegations against its Chairperson.
Honest investors across the country have pressing questions for the government:
– Why… pic.twitter.com/vZlEl8Qb4b
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2024
राहुल गांधी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) तपासाला इतके घाबरले आहेत आणि त्यातून काय उघड होऊ शकते.” हे तर स्पष्ट झाले आहे. राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामन्यातील फिक्सिंगचा संदर्भ देत म्हटले आहे की, पंचानेच तडजोड केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे काय झाले? हे याचे उत्तम उदाहरण आहे.
घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी
सेबीच्या अध्यक्ष माधबी बुच यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे म्हणाले आहे की, या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची गरज आहे. जोपर्यंत जेपीसी या प्रकरणाची चौकशी करत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात दशकांत कठोर परिश्रम घेऊन, उभारलेल्या भारताच्या घटनात्मक संस्थांशी (सेबी) तडजोड करून आपल्या मित्रपक्षाचे संरक्षण करत राहतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.