फोटो सौजन्य - Social Media
Neeta Parab : आजचा बालक म्हणजे उद्याच्या भारताचे भवितव्य मानले जाते. त्यामुळे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांसोबतच शासनही विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत आहे. मुंबईतील चर्नी रोड येथे असलेले ‘बालभवन’ हे अशाच उद्देशाने कार्यरत असलेले एक महत्त्वाचे केंद्र आहे. बालकांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे काम या संस्थेमार्फत सातत्याने केले जात आहे. पालक आणि शिक्षकांनी बालभवनाला आपलेच समजून येथे आयोजित विविध कला उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालभवनाच्या संचालिका नीता सैराज पाटील यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नीता सैराज पाटील या बालभवनाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्या बालभवनाच्या कार्याबाबत बोलताना सांगतात की, बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसते. कला, छंद, प्रयोग आणि विचारांची मुक्त अभिव्यक्ती यांमधून मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते. ‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ हे बालभवनाचे ब्रीदवाक्य असून ‘करा व शिका’ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चार ते सोळा वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवून ही शासकीय संस्था गेल्या ७४ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे.
बालभवनाची स्थापना २४ मे १९५० रोजी तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. तर २४ फेब्रुवारी १९५२ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून बालकांच्या सर्जनशील विकासासाठी या मुक्त अविष्कार केंद्राची निर्मिती करण्यात आली. मुलांना गायन, चित्रकला, नृत्य, मातीशी खेळणे किंवा मुक्तपणे सर्जनशीलता व्यक्त करणे आवडते आणि बालभवन त्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे नीता पाटील सांगतात.
फेब्रुवारी २०२४ पासून नीता सैराज पाटील यांनी बालभवनाची जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोनानंतर काही प्रमाणात ठप्प झालेल्या उपक्रमांना पुन्हा गती देणे तसेच मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना छंदवर्गांकडे वळवणे हे आव्हानात्मक काम होते. मात्र बालभवनातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे त्या सांगतात. चर्नी रोड परिसरासोबतच विरार, नालासोपारा आणि कल्याण परिसरातील विद्यार्थीही उन्हाळी छंद शिबिरासाठी येथे येतात.
उन्हाळी छंद शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध कला आणि क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य, चित्रकला, वारली कला, कॅलिग्राफी, शिल्पकला, गायन, नाट्य, योग, रोप पोल मल्लखांब, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक कलेसोबत गिटार वादन, कराटे आणि स्केटिंगसारख्या आधुनिक प्रशिक्षणाचाही समावेश आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार कला किंवा क्रीडा प्रकार निवडतात आणि आठवड्यातून दोनदा नियमित वर्गही घेतले जातात.
बालभवनातील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत आपली छाप पाडली आहे. यावर्षी जवाहर बालभवनचे विद्यार्थी दिल्ली आणि औरंगाबाद येथे आयोजित बाल एकीकरण शिबिरात सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेतही बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वर्षभर विविध दिनविशेषांनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. छत्री रंगवणे, शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करणे किंवा किल्ले बनवण्यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून बालपणाच्या आठवणी जाग्या होतात, असे नीता पाटील सांगतात.
मुंबई शहर आणि उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी बालभवनतर्फे विविध सहशालेय स्पर्धांचेही आयोजन केले जाते. चित्रकला, एकपात्री अभिनय, लोकनृत्य, समूहगीत, वाद्य वादन आणि वक्तृत्व स्पर्धांसह लेझीम व बँड स्पर्धा घेतल्या जातात. मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण आणि मुंबई पश्चिम या शैक्षणिक जिल्ह्यांतील वॉर्डस्तरावर प्राथमिक फेऱ्या घेतल्यानंतर जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव अलीकडेच बालदिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या समारंभात करण्यात आला.
याशिवाय पर्यावरण दिनानिमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धा, योग दिनानिमित्त योग कार्यक्रम, तसेच विविध शाळांमध्ये नाट्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संगीत कार्यशाळांमध्ये सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर गणपती कृती सत्र कार्यशाळेत सुमारे १४०० विद्यार्थी सहभागी झाले. छत्री रंगवण्याच्या कार्यशाळेत ७५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला, तसेच किल्ले बनवण्याच्या स्पर्धांमध्येही अनेक शाळांनी सहभाग नोंदवला.
दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी बालभवनचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी बालभवनच्या कार्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत या संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.






