सौजन्य - नवराष्ट्र टीम
मालवण : तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या बदलीचा वाद चिघळला असून, संतप्त पालकांनी शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला असून, संबंधित शिक्षकाची पुनर्नियुक्ती न झाल्यास सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतून दाखले काढून घेण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी परागिनी पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय माने आणि पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
शाळेत एकूण २८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पूर्वी तीन शिक्षकांची नियुक्ती होती. मात्र, समायोजन प्रक्रियेत एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर सध्या केवळ मुख्याध्यापक आणि एक सहशिक्षक यांच्या माध्यमातून अध्यापन सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून उपशिक्षकाचे पद रिक्त असल्याने शाळेला शिक्षकांच्या कमतरतेचा सातत्याने सामना करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांशी सुसंवाद निर्माण करून प्रभावी अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचीच बदली झाल्याने मुलांवर मानसिक परिणाम होईल, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदली रद्द करून संबंधित शिक्षकाला पुन्हा तोंडवळी खालची शाळेत नियुक्त करावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
बैठकीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जानव्ही पराडकर, सुरेंद्र मालंडकर, नंदा कोचरेकर, दिपेश मायबा, केतकी मायबा, मनोज चोडणेकर, मनस्वी चोडणेकर, संजय केळूसकर, भूपाल मालंडकर, विजय खवणेकर, संजय अंकुश तारी, स्वप्नील तारी, संजय जुवाटकर, अनिरुद्ध जुवाटकर, अनुष्का जुवाटकर, प्रमोद तोरसकर, प्रिया तोरसकर, दुर्वा मायबा, पुंडलिक मालंडकर, पूर्वा मालंडकर, प्रगती जुवाटकर, स्नेहल केळूसकर, दिक्षा कोचरेकर, अक्षरा कोचरेकर, नम्रता कोचरेकर, स्नेहा कांदळगावकर, नीलिमा रेवंडकर, शमिका धुरी, सांची चोडणेकर, घनश्याम चोडणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी संबंधित बदली शासनाच्या धोरणानुसार आणि समायोजन प्रक्रियेअंतर्गत झाल्याचे स्पष्ट केले. तर गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, पालकांनी हे आश्वासन अपुरे असल्याचे सांगत, “प्रशासनाने पाहणीसाठी येताना संबंधित शिक्षकालाही सोबत आणावे. अन्यथा सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांचे दाखले काढून पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला.






