फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करतात. या शहरात सध्या १०८ रात्रशाळा तर ३९ रात्र कनिष्ठ महाविद्यालये सुरू आहेत. येथे शिकणारे विद्यार्थी हे वयाच्या विविध टप्प्यातील असून त्यापैकी अनेक जण दिवसभर काम करून संध्याकाळी जमेल त्या दिवशी रात्र महाविद्यालयांमध्ये हजेरी लावतात.
या वर्षी अर्ज दाखल केलेल्या १,३८५ विद्यार्थ्यांपैकी १,३१९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मासूम या संस्थेने शहरातील ८१ रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालांमध्ये शिक्षक पुरवणे, इतर सोयी उपलब्ध करून देणे हे काम हाती घेतले आहे. या संस्थेच्या निकिता शिवचरण (७७.३३), सारिका जाधव(७३.८३) आणि अशोक पावसे(७१.३३) या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या विद्यालयातील कोणी चहाची टपरी चालवते, तर कोणी कडधान्य विक्रीचा व्यवसाय करते, कोणी घर संभाळत तर कोणी कारखान्यात काम करत हे यश मिळवले आहे.
Viral Video :परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींचा विनयभंग? पाकिस्तानातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!
या ३९ रात्र महाविद्यालयांच्या निकालापैकी तब्बल १० रात्र महाविद्यालयांचा निकाल ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर चार महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच यावेळी २५ महाविद्यालयांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल नोंदवला आहे. मुंबई सेंट्रलच्या मॉडर्न नाइट हायस्कूलचे मुख्याध्यापक निरंजन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी सरकारचे ठोस धोरण नसल्याने या शाळांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. येथे विषयाला शिक्षक न मिळणे, साहित्याचा अभाव, घटती विद्यार्थी संख्या अशा अनेक अडचणी येत आहेत.






