फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील दहावी-बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या परीक्षेचा निकाल यंदा उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण नागपूर विभागातील शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संभाव्य आंदोलनाचा थेट परिणाम निकाल प्रक्रियेवर होण्याची शक्यता असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिक्षण मंडळाने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या बढती आणि बदलीसंदर्भात धोरणात बदल करत ही मुदत २ वर्षांवरून वाढवून ४ ते ६ वर्षांपर्यंत नेली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असून त्याबाबत राज्य शिक्षण कर्मचारी संघटना यांना विश्वासात घेण्यात आले नाही. परिणामी संघटनांमध्ये असंतोष वाढला असून त्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जर हे आंदोलन प्रत्यक्षात सुरू झाले, तर उत्तरपत्रिकांची तपासणी, गुण नों दणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर काही आठवड्यांत निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा या आंदोलनामुळे निकालाची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेषतः उच्च शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया, प्रवेश परीक्षा आणि करिअर नियोजनावर याचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन टाळण्यासाठी चर्चा आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर राज्यभरातील निकाल प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अधिकृत घोषणांची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर समन्वय होऊन निकाल वेळेत जाहीर व्हावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.






