गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला (संग्रहित फोटो)
कल्याण : कल्याणमधील उंबर्डे येथील कोळीवली परिसरातील रॉयल ढाब्यावर मोबाईल गेमवरून झालेल्या किरकोळ वादाने रक्तरंजित वळण घेतले. १७ वर्षीय मामाने चाकूने गळा चिरून आपल्याच १९ वर्षीय भाच्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
आरोपी चित्रा बहादूर (वय १७) आणि मयत गोखिल भीम बहादूर (वय १९) दोघेही मूळचे नेपाळचे असून, रॉयल ढाब्यावर काम करत होते. गेम खेळताना या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, काही वेळातच वाद इतका वाढला की, रागाच्या भरात आरोपीने जवळच ठेवलेला चाकू उचलून गोखिल यांच्या मानेवर वार केला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने गोखिल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी कल्याण येथील रुक्मणीबाई रुग्णालयात पाठवला आहे. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या परिसरात सुरू असलेले ढाबे आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पुण्यात RPI कार्यकर्त्याची हत्या
आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे. अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, खेड) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांच्या वाहनावरील चालक नागनाथ कुंडलिक चाटे (वय ४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.






