बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावर भीषण अपघात; पिता-पुत्राचा मृत्यू
बार्शी : बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावरील बीआयटी कॉलेजजवळ भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे बार्शी शहरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी मयत राजेश सोनवणे यांचा मुलगा सक्षम राजेश सोनवणे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कारचालक महेश नानासाहेब काजळे (रा. आरणगाव) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक राजेश मोहन सोनवणे (वय ५०) आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा तेजस उर्फ स्वराज सोनवणे हे दोघे घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी डिझायर (क्र. एमएच-१३-ईएक्स-२२८२) या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी राजेश सोनवणे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले, तर मुलगा तेजस उर्फ स्वराज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत राजेश सोनवणे हे बार्शीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत हेमंत सोनवणे यांचे सख्खे भाऊ होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. या दुर्दैवी घटनेमुळे बार्शी शहरात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गावर काळाचा कहर
समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.






