"कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा..." , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात
भांडुप पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ तुळशेत पाडा परिसरात वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर सिद्धार्थ न सापडल्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी विहार तलाव परिसरात, मुलुंड पोलिसांच्या हद्दीत सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला. भांडुप परिसरातील मुले पोहण्यासाठी विहार तलावात जात असल्याने सिद्धार्थ पोहताना बुडाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली. त्यामुळे प्रथम अपमृत्यूची नोंद करण्यात आली.
मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली. अहवालात सिद्धार्थच्या फुफ्फुसात व पोटात पाणी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे नमूद होते. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत नव्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच्या एका मित्रासोबत पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या आधारे मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्ही चौघे पोहायला गेलो होतो आणि सिद्धार्थ बुडाला, असे त्याने सांगितले. इतर दोन मित्रांनीही सुरुवातीला हीच माहिती दिली.
मात्र शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांनंतर तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. अखेर तिन्ही अल्पवयीन मित्रांनी सिद्धार्थची हत्या केल्याची कबुली दिली. सिद्धार्थ आमच्यावर सतत दादागिरी करत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही त्याला तलावाजवळ बोलावले आणि मारहाण केली. या मारहाणीत काठीचा घाव डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह तलावात टाकल्याचे आरोपींनी कबूल केले. या प्रकरणातील तिन्ही अल्पवयीन आरोपींची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.






