Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास 'वालीच' नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल
पावसाचे आगमन नेहमीपेक्षा लवकर मे महिन्यातच झाले. अतिवृष्टी, वादळी वारे आणि काही भागांत पूरस्थिती निर्माण होऊनही सुरुवातीला भात पिकाची वाढ समाधानकारक झाली. त्यामुळे शेतकरी आनंदित होता. भरघोस उत्पादनाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी गौरी-गणपती तसेच नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला. शेतात भरगच्च कणसे पाहून वर्षभराच्या खर्चाचे नियोजन शेतकरी करू लागला होता.
लाणी-बांधणीच्या हंगामात मजुरांची टंचाई आणि अव्वाच्या सव्वा मजुरी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिके कापण्याचाही निर्णय घेतला नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांच्या पदरात ५० टक्केही धान्य पडले नाही. भिजक्या भाताची स्थिती इतकी वाईट होती की धान्य खरेदी केंद्रांवरही त्याची खरेदी करण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.
कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली होती. महसूल विभागाकडून, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतीचे फोटो घेऊन ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे अहवाल पाठविण्यात आले. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची खत व्यक्त होत आहे. नुकसान भरपाईच्या आशेने शेतकरी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे वास्तव आहे.
मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या सुमारास सतत पडलेल्या पावसाने सर्व आशा धुळीस मिळाल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाताची परिपक्व कणसे शेतातच आडवी पडली. शेतात पाणी साचल्याने पेंढा कुजला आणि कणसातील भात काळवंडून निकृष्ट झाला. काही ठिकाणी तर भाताला कोंब फुटल्याचेही दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे नुकसान झाले.
शेतीतील तोटा भरून काढण्यासाठी रायगडमधील अनेक शेतकरी फलोत्पादनाकडे वळले असून आंबा लागवडीला प्राधान्य देत आहेत. चांगली निगा राखल्यामुळे आंबा झाडांना भरपूर मोहोर येतो. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून हा मोहोर काही दिवसांत करपत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून तीन-चार वेळा फवारणी करत असले तरी फळधारणा होत नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च वाया जात आहे.
मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?
या समस्येवर शास्त्रीय कारणे शोधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होत आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वाघोली (ता. अलिबाग) येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्या वेळी लवकरच शिबिर आयोजित केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्याप शिबिराचे आयोजन झालेले नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.






