(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये प्रेक्षकांना जुलै महिन्यात एक भव्य आणि दैवी पर्व अनुभवायला मिळणार आहे. ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ या विशेष कथानकातून मानवी मनाला ग्रासणाऱ्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार भयंकर विकारांविरुद्ध आई तुळजाई घनघोर युद्ध पुकारताना दिसणार आहे.
आदिशक्तीचे पवित्र प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘दिव्य स्वस्तिकाचा’ महिमा उलगडत ही कथा भक्ती, श्रद्धा आणि दुष्ट शक्तींविरुद्धच्या संघर्षाची नवी दिशा दाखवणार आहे. या विशेष अध्यायात दैवी शक्ती आणि आसुरी प्रवृत्ती यांच्यातील महासंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पाताळदेवीचा कट आणि तुळजाईचा निर्णायक लढा
कथानकानुसार, आगामी चातुर्मासात संपूर्ण भुलोकावर विकारांचे साम्राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने पाताळातील अघोरी आदिम शक्ती ‘पाताळदेवी’ जागृत होते. आपल्या साथीदार भुजंगाच्या माध्यमातून ती एका निष्पाप कुटुंबाला लक्ष्य करत मानवी मनाला कैद करणाऱ्या चार विकारांचा प्रसार करण्याचा कट रचते.
दरम्यान, अवकाशात प्रकट झालेल्या ‘दिव्य स्वस्तिका’तील ताऱ्यांचे तेज लोकांच्या सत्कर्मामुळे अधिक प्रखर होत असते. मात्र, हे तेज कायमचे विझवण्यासाठी पाताळदेवी आपला पहिला डाव खेळते. या अभूतपूर्व संकटामुळे दैवी आणि आसुरी शक्तींमध्ये महासंग्रामाची ठिणगी पडते आणि आई तुळजाभवानी दुष्ट शक्तींविरुद्ध निर्णायक लढा उभारते.
“संकटं नाहीशी नाही, तर त्यांच्याशी लढण्याची शक्ती द्यायची”
या कथानकातील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आई तुळजाभवानीची भूमिका. ती आपल्या भक्तांना संकटांपासून दूर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर मात करण्याची ताकद देण्याचा निर्धार व्यक्त करते.
“मला भक्तांची संकटं नाहीशी करायची नाहीत, तर त्यांना संकटांवर मात करण्याची शक्ती द्यायची आहे,” हा तिचा खणखणीत संदेश प्रत्येक प्रेक्षकाला नवा आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.
आता पाताळदेवीच्या मायावी शक्तींना आई तुळजाभवानी कशा प्रकारे पराभूत करणार? भाग्यकुंभावर उमटणारं ‘स्वस्तिक’ कोणते नवे चमत्कार घडवणार? आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी तुळजाई कोणती दिव्य शक्ती प्रकट करणार? याची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.






