फोटो सौजन्य - Social Media
कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँडअप शोमधील एका वादग्रस्त व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरण म्हणून चर्चेत आलेल्या या वादात एका प्रेक्षकाने महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनेही या संपूर्ण प्रकरणावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रणित मोरेच्या शोमध्ये सहभागी झालेला हिमांशु जांग्रा स्वतःच्या डेटिंग अनुभवाविषयी बोलत होता. त्यावेळी त्याने “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलं, मग ते पैसे वसूल करायला नको का?” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेकांनी हे विधान महिलांचा अपमान करणारे आणि चुकीचा संदेश देणारे असल्याचे म्हटले. या वादानंतर हिमांशु जांग्राला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच सोशल मीडियावर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.
अशातच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. “प्रणित मोरेच्या शोमधील व्हायरल क्लिप पाहिली आणि मला अक्षरशः किळस आली. एका व्यक्तीने संपूर्ण कार्यक्रमात अभिमानाने सांगितले की, डेटवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी त्याच्या काही अपेक्षा होत्या. हे ऐकून धक्का बसला,” असे तिने पोस्टमध्ये नमूद केले. याशिवाय त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरही तिने प्रश्न उपस्थित केले. “तो व्यक्ती असे बोलत असताना सभागृहातील अनेक जण हसत होते. हे डार्क कॉमेडी नसून अत्यंत लज्जास्पद वक्तव्य होते. अशा विचारसरणीला हसून दाद देणारे लोकही तितकेच जबाबदार आहेत,” असे अपूर्वाने म्हटले आहे.
अपूर्वाने या निमित्ताने प्रेक्षकांनाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. “आपण कोणाला प्रसिद्धी देतो, कोणाला फॉलो करतो आणि कोणाला सोशल मीडिया स्टार बनवतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरे मनोरंजन आणि विषारी विचार यामधला फरक ओळखायला हवा. अशा टॉक्सिक लोकांना व्यासपीठ देणे आणि त्यांना प्रसिद्ध करणे थांबवले पाहिजे,” असे ती म्हणाली. अपूर्वाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तिच्या मताला समर्थन दिले असून महिलांविषयी अपमानास्पद भाष्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर काहींनी स्टँडअप कॉमेडीच्या मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चर्चा सुरू केली आहे.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर हिमांशु जांग्राने सार्वजनिक माफी मागितल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याने आपले सोशल मीडिया खातेही बंद केले आहे. त्याच्या कंपनीच्या संस्थापकांनी व्हिडीओद्वारे त्याची सेवामुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे सोशल मीडिया संस्कृती, स्टँडअप कॉमेडी आणि महिलांविषयीच्या दृष्टिकोनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






