मौलाना जरजिस अन्सारींच्या वादग्रस्त विधानामुळे हिंदू संघटना आक्रमक
Maulana Jarjis on Shri Krishna: मागील काही वर्षांपासून उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी स्थळावरून सुरू असलेला वाद सुरु असतानाच मौलाना जरजिस अन्सारी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. “भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते. श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत असत.” असं खळबळजनक विधान जरजीस यांनी केलं आहे. या वक्तव्यांनंतर, हिंदू संघटनांनी मौलाना जरजिस अन्सारी यांच्याविरोधात आक्रमक झाल्या असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. (hindu-muslim politics)
आपल्या भाषणादरम्यान, मौलाना जरजिस अन्सारी यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील एका श्लोकाचा उल्लेख करत ते म्हणाले की, श्रीमद् भगवद्गीतेत म्हटले आहे, “योगी युंजित् सततममनं रासि स्थितः। एकाकि यचित्त्तात्मा निराशिर्परिग्रहः।” मौलाना जरजिस यांनी दावा केला की, हा श्लोक भक्तांना संपूर्ण शरीराने पूजा करण्याचा निर्देश देतो. स्वतः भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा प्रार्थना करत असत.
आपल्या वक्तव्यात मौलानांनी भगवद्गीतेतील या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला. वास्तविक पाहता, हा भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहावा श्लोक आहे. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे: “आपले मन, शरीर आणि आत्मा सतत परमेश्वराला समर्पित करणे हे योग्याचे कर्तव्य आहे. त्याने एकांत स्थळी एकांतात राहावे आणि आपले मन व इंद्रिये नियंत्रित करून स्वतःला सर्व इच्छा आणि आसक्तींपासून मुक्त करावे.” या श्लोकात कुठेही नमाज किंवा इस्लामचा उल्लेख नाही.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मौलाना जरजिस अन्सारी यांनी कथितरित्या दावा केला की, भगवान श्रीकृष्ण मुस्लिम होते आणि प्रार्थना करत असत. तेव्हापासून साकेत भवन मंदिराचे महंत सीताराम दास यांनी यावर आक्षेप घेत, “मला या कट्टरपंथी मौलवीला विचारायचे आहे की, हे कुठे लिहिले आहे? त्यांनी आपली निराधार आणि निरर्थक वक्तव्ये मागे घ्यावीत. अन्यथा, सनातनींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होईल. जोपर्यंत ते समाजाची आणि सनातनी समुदायाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे प्रकरण शांत बसू देणार नाही. मी सरकारला आवाहन करतो की, त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी.” असा इशारा दिला आहे.
पण त्यांचे हे वक्तव्य बरेच जुने असल्याचे म्हटले जाते. श्री कृष्ण जन्मभूमी स्थळावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते व्हायरल झाले आहे. मौलानांचे वक्तव्य व्हायरल होताच, हिंदू संघटनांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. हिंदू संघटनांनी मौलानांवर कारवाई करण्याची आणि त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.






