( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीनामात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत असताना, विविध कारणांमुळे वारीत सहभागी होऊ न शकलेल्या भाविकांसाठी ‘सन मराठी’ वाहिनीने एक अनोखा आणि अर्थपूर्ण उपक्रम राबवला आहे.
देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरील विविध गावांमध्ये ‘इच्छा कलश’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भाविकांना सीड पेपर (बियायुक्त कागद) दिला जात असून, त्यावर ते आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना किंवा विठुरायाबद्दलच्या भावना लिहित आहेत. त्यानंतर हे सीड पेपर विशेष ‘इच्छा कलशात’ जमा केले जात असून, ते पंढरपूरच्या पवित्र भूमीत पोहोचवले जाणार आहेत.
या भक्तिमय उपक्रमात ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांभेकर देखील सहभागी होणार आहे. ती पंढरपुरात जाऊन विठुरायाची महापूजा करणार असून, या अनुभवाबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे.
सान्वी म्हणाली, “‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेमुळे मला पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्याची संधी मिळत आहे. ‘इच्छा कलश’ हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. ज्यांना वारीत सहभागी होता आलं नाही, त्यांच्याही भावना विठुरायापर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे. वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि समर्पण मला नेहमीच प्रेरणा देतं. आता प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
या उपक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वापरण्यात आलेला सीड पेपर पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. वारीनंतर या कागदांची लागवड केली जाणार असून, त्यातून नवीन रोपे उगवतील. अशा प्रकारे भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा ‘सन मराठी’चा हा उपक्रम सध्या विशेष चर्चेत आहे.






