फोटो सौजन्य - Social Media
सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट गाजलेल्या कन्नड चित्रपट ‘Su From So’ चा रिमेक असला, तरी त्यातील कलाकारांचा उत्कृष्ट विनोदी अभिनय, लक्षवेधी संगीत आणि चित्रपट साकारण्यासाठी संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने सुमारे ₹9.34 कोटींची ग्रॉस कमाई केली असून, अनेक बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते त्याची एकूण कमाई ₹15 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार चित्रपटाचे नेट कलेक्शन किमान ₹15 कोटींपर्यंत पोहोचू शकते. मात्र, तिसऱ्या क्रमांकावरील ‘क्रांतीज्योती विद्यालय’ या चित्रपटाने सुमारे ₹27.35 कोटींचे नेट कलेक्शन केले असल्याने ‘तुंबाडची मंजुळा’ला तो टप्पा गाठणे सध्या तरी आव्हानात्मक वाटत आहे. असे असले तरी, वाढती लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता हा चित्रपट पुढील काळातही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या चित्रपटाला खऱ्या अर्थाने चार चांद लावले आहेत ते त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने! प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग साधत आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेष म्हणजे, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व रुकेने याच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, त्याच्या चाहत्यांनीही त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहांकडे मोठी गर्दी केली आहे.
चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे त्याची भावनिक मांडणी. मध्यंतरापूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा सिनेमा, मध्यंतरानंतर मात्र अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतो. विनोद, भावना, मस्ती आणि मनोरंजन यांचा सुंदर मेळ साधणारा हा चित्रपट कॉमेडीप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरतो.
संगीताच्या बाबतीतही चित्रपटाने वेगळी छाप सोडली आहे. ‘अस्सं वेगळं गाव’ हे गीत कोकणातील निसर्गसौंदर्य आणि गावकुसातील वातावरण जिवंतपणे उभे करते. संगीतकार विशाल दादलानी यांच्या आवाजातील ‘तर्राट’ हे गाणे उत्साहाने भरलेले परफेक्ट पार्टी सॉंग वाटते. ‘पुन्हा-पुन्हा’ या गाण्यात अनेक वर्षांनंतर जुन्या प्रेमाची झालेली भेट आणि त्यातून जाग्या होणाऱ्या भावना प्रभावीपणे व्यक्त होतात, तर ‘नभ सोनेरी सोनेरी’ हे गीत प्रेम मिळाल्याचा आनंद साजरा करते. या सर्व गाण्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे गीत म्हणजे ‘हे देवा मला पाव की रे’. मराठी शब्दरचना असूनही या गाण्याच्या चालीत जाणवणारा पाश्चिमात्य सुरांचाहलका स्पर्श त्याला वेगळेपण देतो आणि त्यामुळेच ते श्रोत्यांच्या मनात सहज घर करून जाते.






