कोझिकोड : लोकसभा निवडणुकीत मला उमेदवार बनवण्यासाठी तीन राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत. परंतु, ते माझ्या विचारसरणीमुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा टीकाकार असल्यामुळे माझा वापर राजकारणात करू इच्छित आहे, असा दावा अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केला. मात्र, मला या फंदात पडायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केरळ येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये (केएलफ) ते बोलत होते. पुरस्कार विजेत्या प्रकाश राज यांनी कांचीवरम, सिंघम आणि वॉन्टेडसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमधील दमदार भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बंगळुरू सेंट्रलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. परंतु त्यांना यश आले नाही.
विरोधकांचा आवाज कमी झाला
अभिनेता प्रकाश राज पुढे म्हणाले, आज देशातील सत्ताधाऱ्यांपुढे विरोधी पक्षांचा आवाज कमी झाला आहे. त्यामुळेच अनेक विरोधी पक्ष उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे. राजकारणात सत्याचा आवाज दाबला जात असल्यामुळे आज राजकीय पक्षांना उमेदवार मिळत नाही, ही शोकांतिका आहे. दरम्यान, अंजना शंकर यांनी प्रकाश राज यांना विचारले तुम्ही मोदींचा द्वेष का करता, यावर ते म्हणाले, मी त्यांचा द्वेष करत नाही. ते काही माझे सासरे नाहीत. ना माझा त्यांच्याशी मालमत्तेचा वाद आहे. मी फक्त करदाता आहे.
मी लोकांच्या मनातील बोलतो
एक्सवर सरकारवर टीका करणाऱ्या आपल्या पोस्टचा बचाव करताना प्रकाश राज म्हणाले, मी तेच बोलतो जे प्रत्येकाच्या मनात आहे. हा माझा आवाज नाही, हा लोकांचा आवाज आहे. ही माझी ‘मन की बात’ नाही तर आमची ‘मन की बात’ आहे. सतेत असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. मी त्यांना मत दिले की नाही, हा प्रश्नच नाही. ते आमचे पंतप्रधान आहेत. आपण लोकशाहीत राहतो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू नका, असे म्हणता येत नाही. आज ते पदावर आहे म्हणून त्यांना बोलतो, उद्या दुसरे कोणी या पदावर आले तर त्यांनाही बोलेल, असेही ते म्हणाले.






