बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पहिल्या भाषणात भाजप व मोदींचे कौतुक केले (फोटो - सोशल मीडिया)
Bihar CM : बिहार : बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) एक मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. नितीश कुमार यांचे पर्व संपले असून बिहारमध्ये भाजप राज सुरु झाले आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा नेता मुख्यमंत्री झाले आहे. भाजप (BJP) नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला असून विकासाची हमी दिली आहे. आपण तात्काळ कामाला सुरुवात करणार असल्याचे आणि राज्यात ‘मोदी-नितीश मॉडेल’ कायम राहील, असे स्पष्ट मत नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी व्यक्त केले.
नितीश कुमार राज्यसभेत गेल्यानंतर बिहारमधील सत्ता आता थेट भाजपच्या नेतृत्वाखाली आली आहे. शपथविधीनंतर लगेचच सम्राट चौधरी यांनी पाटणा येथील लोक भवनात पदभार स्वीकारला. यावेळी बाहेर ‘बुलडोझर बाबा जिंदाबाद’च्या घोषणा ऐकू येत होत्या, परंतु त्यांनी स्पष्ट केले की बिहार आपल्या स्वतःच्या अद्वितीय विकास धोरणावरच पुढे वाटचाल करेल. तसेच राज्यात आतापर्यंत राबवले गेलेले विकास आणि सुशासनाचे धोरणच पुढे चालू ठेवले जाईल, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : राघव चड्ढांचा BJP ने घेतला बदला? नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल ED च्या रडारवर
सम्राट चौधरी यांनी यापूर्वी नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता, नव्या व्यवस्थेअंतर्गत विजय कुमार चौधरी आणि विजेंद्र कुमार यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा बदल म्हणजे जुन्या धोरणांना नव्या नेतृत्वाची जोड देणारा बिहारच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
हे देखील वाचा : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?
जितन राम मांझी यांचे कौतुक
यावेळी केंद्रीय मंत्री जितन राम मांझी म्हणाले की, नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांपासून जे शासन मॉडेल दिले आहे, ते पुढे नेण्याची जबाबदारी आता सम्राट चौधरी यांच्यावर आहे. काही कमतरता असल्यास, नवीन सरकार त्या दूर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भावूक झालेल्या मांझी यांनी असेही सांगितले की, त्यांच्या राजकीय प्रवासात नितीश कुमार यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर भाजप नेते दिलीप जयस्वाल यांनीही नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, सम्राट चौधरी नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला ‘विकसित बिहार’च्या दिशेने नेतील.






