
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते.
नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. अलीकडे सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात (Gold Smuggling) वाढली आहे.
देशात चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. 2022 मध्ये भारताने 35 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. भारतीय चलनात ही किंमत 2,91,060 कोटी रुपये आहे. कच्च्या तेलानंतर (पेट्रोलियम) भारताचे सर्वाधिक आयात बिल सोन्याचे आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने ‘सार्वभौम सुवर्ण रोखे’ सारखी योजनाही आणली आहे, पण परिस्थिती अशी आहे की मागणी पूर्ण करण्यासाठी देशात सोन्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाही (एप्रिल-सप्टेंबर 2023) देशात सोन्याची तस्करी वाढली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, यावर्षी 2000 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात पकडण्यात आलेल्या तस्करीच्या सोन्याच्या तुलनेत हे प्रमाण 43 टक्के अधिक आहे.
गेल्या वर्षी एप्रिल- सप्टेंबरमध्ये 1 हजार 400 किलो सोने जप्त करण्यात आले होते. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरकारने सुमारे 3 हजार 800 किलो सोने जप्त केले होते.