उत्तरेत उष्णतेची लाट श्रीगंगानगर @ ४८.२
नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेने उत्तर भारत अक्षरशः होरपळून निघत आहे. हवामान विभागानुसार, राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे देशात सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त होते, तेव्हा उष्णतेची लाट जाहीर केली जाते; तर ४७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला तीव्र उष्णतेची लाट म्हटले जाते.
श्रीगंगानगरचे तापमान सामान्यापेक्षा ५.५ अंशांनी अधिक होते, तर राजस्थानच्या इतर भागांत ४६ ते ४७ अंश तापमान राहिले. पिलानी ४७ अंशांसह दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले. पाठोपाठ बिकानेर (४६.६), चुरू आणि जैसलमेर (४६.४), फलोदी (४६.२) आणि कोटा (४५.४) यांचा क्रमांक लागला. उत्तर प्रदेशचा बांदा जिल्हा ४७.८ अंशांसह राज्यात सर्वाधिक उष्ण ठरला आहे. प्रयागराज (४६.४), झाशी (४६ , ओराई (४५.६) आणि देवमाली (४५.१ अंश) येथेही उच्च तापमान राहिले. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडचे तापमान ४५ ते ४६ अंशांदरम्यान राहिले.
दरम्यान, डेहराडून हवामान केंद्राने उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवसांत पाऊस, गारपीट आणि वारा वाहण्याची शक्यता आहे.
नागपुरात दहा जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उष्णतेने जनजीवन विस्कळीत होत आहे. बुधवारी शहरासह नागपूर रेल्वे स्थानक आणि विविध गाड्यांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये शहर हद्दीत ५, स्थानकावर २ तर ३ प्रवाशांचा मृत्यू गाड्यांच्या आत झाला.
भीषण उष्णता आणि गर्दी ठरली जीवघेणी
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, गाड्यांमधील प्रचंड उष्णता आणि सामान्य डब्यांतील अतिगदर्दीमुळे प्रवाशांची प्रकृती सतत बिघडत आहे. अनेक कोचमध्ये पुरेशा वायुवीजनाची व्यवस्था नसल्याने आतील तापमान अधिक जाणवत आहे. रेल्वेकडून या मृत्यूंचे कारण आजारपण सांगितले जात असले, तरी प्रथमदर्शनी उष्माघाताची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम






