उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उष्णतेने जनजीवन विस्कळीत होत आहे. बुधवारी शहरासह नागपूर रेल्वे स्थानक आणि विविध गाड्यांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये शहर हद्दीत ५, स्थानकावर २ तर ३ प्रवाशांचा मृत्यू गाड्यांच्या आत झाला.
प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात या मृत्यूंचे संभाव्य कारण मानले जात आहे. सर्व प्रकरणांमध्ये शहर पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी सुमारे १.१५ वाजता कृष्णा भोजनालयासमोरील फ्लायओव्हरखाली एका खांबाजवळ सुमारे ६५ वर्षीय अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली. त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
दुसऱ्या घटनेत सुमारे ५० वर्षीय व्यक्ती कळमना फळबाजारात बेशुद्धावस्थेत आढळला. त्यालाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही ३ अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. एक व्यक्ती सक्करदरा चौक फ्लायओव्हरखाली, दुसरा मोठा ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ आणि तिसरा मोठा ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे आढळला. तिघांनाही मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले, या तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्लॅटफॉर्मवर आढळले २ मृतदेह
दरम्यान, बुधवारी सकाळी ११.४० च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आलेल्या ट्रेन क्रमांक २२६९२ निजामुद्दीन-बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसच्या गार्ड बोगीसमोर सुमारे ४० वर्षीय अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यानंतर दुपारी १२.४८ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या इटारसी टोकावरील नव्या वेटिंग हॉलजवळ सुमारे ७० वर्षीय अन्य एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह सापडला.
गाड्यांमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू
दुपारी २.३५ वाजता नागपूर स्थानकावर आलेल्या ट्रेन क्रमांक १५२९३ चारलपल्ली अमृत भारत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात प्रवासी मुसरिका रोनामा (वय ६०) यांची प्रकृती बिघडल्यानंतर मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी ३.१२ वाजता ट्रेन क्रमांक १२६२१ चेन्नई सेंट्रल-नवी दिल्ली तमिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये प्रवासी मेहरबान केवट (वय ३४) मृतावस्थेत आढळले. तर सायंकाळी ७.३७ वाजता ट्रेन क्रमांक १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या एस-२ कोचमध्येही एका प्रवाशाच्या मृत्यूची माहिती समोर आली.
भीषण उष्णता आणि गर्दी ठरली जीवघेणी
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, गाड्यांमधील प्रचंड उष्णता आणि सामान्य डब्यांतील अतिगदर्दीमुळे प्रवाशांची प्रकृती सतत बिघडत आहे. अनेक कोचमध्ये पुरेशा वायुवीजनाची व्यवस्था नसल्याने आतील तापमान अधिक जाणवत आहे. रेल्वेकडून या मृत्यूंचे कारण आजारपण सांगितले जात असले, तरी प्रथमदर्शनी उष्माघाताची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.






