India Alliance -DMK Dispute: राजकीय भूकंप! 'इंडिया' आघाडीचा मुख्य आधारस्तंभ ढळला; मोठ्या पक्षाने थेट जाहीर केला बहिष्कार!
India Alliance -DMK Dispute: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टिव्हीके पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर तेथील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. टिव्हीकेचे नेते आणि तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना व्यासपीठावर स्थान दिले. पण त्यानंतर तेथील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची येत्या ८ जूनला दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. आगामी बैठकीचे निमंत्रण दक्षिणेतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रविड मुनेत्र कळघम यांच्या म्हणजेच Dravida Munnetra Kazhagam ला देखील देण्यात आले आहे. पण डिएमके ने या बैठकीला सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून झालेल्या कथित “विश्वासघातामुळे” हा निर्णय घेतल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
चेन्नई येथील पक्ष मुख्यालय अण्णा अरिवलयममधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात डीएमकेने सांगितले की, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राज्यांच्या अधिकारांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्ष सातत्याने संघर्ष करत आला आहे. यामध्ये NEET परीक्षा, मतदारसंघ पुनर्रचना, मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR), निवडणूक आयोगाचे कामकाज, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रस्ताव, वक्फ कायदा आणि परकीय योगदान नियमन कायद्यातील (FCRA) सुधारणा यांचा समावेश आहे.
इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून डीएमके हा इंडिया आघाडीचा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन ( M.K.Stalin) यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रश्नांवर आघाडीची भूमिका मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
डीएमकेने आपल्या निवेदनात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित ‘विश्वासघाताचा’ उल्लेख केला आहे. या घडामोडींमुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज आणि दुखावले गेल्याचे सांगत, काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे डीएमकेने स्पष्ट केले. त्याचवेळी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा अर्थ राष्ट्रीय मुद्द्यांपासून माघार घेणे नसल्याचे पक्षाने नमूद केले आहे. नीट, वक्फ कायदा, एक राष्ट्र-एक निवडणूक आणि इतर जनहिताच्या विषयांवर आपला संघर्ष सुरूच राहील, तसेच राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर मित्रपक्षांना पाठिंबा देत राहू, असेही पक्षाने स्पष्ट केले.
दरम्यान, सी. जोसेफ विजय यांच्या यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने तामिळनाडूमधील रिक्त राज्यसभा जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काँग्रेससाठी मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे. राज्यातील सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. मात्र, या निर्णयावर डीएमकेने टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते ए. सर्वानन यांनी निशाणा साधला आहे. संसदेत भाजपशी थेट संघर्ष टाळण्यासाठीच ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. “टीव्हीकेला संसदेत भाजपविरोधात थेट भूमिका घ्यायची नाही, त्यामुळे ही जबाबदारी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
डीएमकेच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीसमोरील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






