नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, यादरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.
गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने देशातील सर्वात जुन्या पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळली, ज्यामध्ये आयकर विभागाने 523 कोटी रुपयांची मागणी केली आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आयकर विभागाने लोकसभा निवडणुकीच्या तीन आठवड्यांपूर्वी काँग्रेस पक्षाकडून 523.87 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
न्यायाधीकरणाचा आदेश कायम
25 मार्च रोजी न्यायालयाने काँग्रेसने दाखल केलेल्या तीन याचिका हे सांगत फेटाळल्या की, राजकीय पक्षाने मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी मुदत संपण्याच्या काही दिवस आधी न्यायालयात धाव घेतली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयकर कायद्यांतर्गत काँग्रेसच्या उत्पन्नाची अधिक चौकशी करण्यासाठी पुरेसे आणि ठोस पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयाने 8 मार्च रोजी आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने दिलेला आदेश कायम ठेवला होता.






