Tamilnadu Politics: निवडणुकीनंतर भाजपला पहिला झटका! अण्णामलाईंचा अखेरचा रामराम
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, अण्णामलाई यांनी चांगल्या संबंधांतून भाजप सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला आता स्वत:च्या मार्गाने पुढे जायचे आहे, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान भाजपकडून अद्यापही त्यांना समाजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खास बाब म्हणजे,त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील भूमिकेचाही विचार केला जाऊ शकतो.
भाजप त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील भूमिकेचा विचारही करू शकते. वृत्तानुसार, अण्णामलाई यांना पुढील सूचना मिळेपर्यंत दिल्ली सोडून न जाण्यास सांगण्यात आले आहे.
जर भाजपने अण्णामलाई यांचा राजीनामा स्वीकारला, तर दक्षिणेच्या भाजपसाठी हा मोठे राजकीय नुकसान असणार आहे. विशेषतः अभिनेते-राजकारणी विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर, अण्णामलाई यांचे भाजपमधून बाहेर पडणे हे तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठे स्थित्यंतर ठरू शकते. अण्णामलाई यांच्या जवळच्या सूत्रांनुसार, विजय यांच्या राजकीय उदयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. आज विजय यांना आव्हान देणारा कोणीही नेता नाही आणि द्रविड युग संपले आहे, अशी चर्चा तामिळनाडूच्या राजकारणात सुरू झाली आहे. तामिळनाडूत आता केवळ भाषेवर आधारित राजकारण आता चालणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून अण्णामलाई परस्पर संमतीने भाजप सोडण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांना आता भाजपमध्ये भविष्य दिसत नसल्यामुळे अण्णामलाई नवीन पक्ष स्थापन करू शकतात, असेही म्हटले जात होते. नैनार नागेंद्रन तामिळनाडू भाजपचे प्रमुख झाल्यापासून अण्णामलाई कमी सक्रिय असल्याचे दिसून येत होते.
दिल्लीला जाण्यापूर्वी, अण्णामलाई यांनी आपल्याबद्दलच्या अटकळांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “कृपया थांबा. आम्ही दोन दिवसांनी बसून बोलू.” त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य घोषणेबद्दलची लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
माजी आयपीएस अधिकारी असलेले अण्णामलाई २०२० मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि पक्षात झपाट्याने प्रसिद्धी मिळवून पक्षाच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक बनले. २०२१ ते २०२५ या काळात तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक राज्यव्यापी प्रचारमोहिमांचे नेतृत्व केले आणि तरुण मतदार व सोशल मीडियावरील अनुयायांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.
२०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या भविष्याबद्दलच्या अटकळी अधिक तीव्र झाल्या, कारण भाजपच्या सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक असूनही अण्णामलाई यांनी निवडणूक लढवली नाही. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रि-भाषा धोरण राबवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी अलीकडेच केलेल्या टीकेमुळे राजकीय चर्चा सुरू झाली आणि पक्ष नेतृत्वाशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल नवीन अफवांनाही जन्म मिळाला.
राजकीय तज्ज्ञांच्या मते अण्णामलाई भाजपमध्ये अधिक प्रमुख भूमिका मिळवू पाहत आहेत, तर काहींच्या मते ते एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करू शकतात. मात्र, भाजप नेत्यांनी पक्षात फूट पडल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या असून, अण्णामलाई हे पक्षात एक महत्त्वाचे नेते राहतील असे म्हटले आहे.






