देशभरातील टोल प्लाझा हटवणार; नितीन गडकरींची नवी योजना नेमकी काय?
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि टोल हे विषय नेहमी चर्चेत असतात. टोल आणि वाद हेही समीकरण मध्यंतरी चांगलेच ऐरणीवर आले होते. आता याच टोलच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक नवीन योजना आणत असल्याचे सांगितले. या नवीन प्रणालीत वाहनांना आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, २०२६ च्या अखेरपर्यंत देशभरातील टोल प्लाझा रद्द केले जाऊ शकतात. त्यांच्या जागी एक नवीन प्रणाली आणली जाईल, ज्यामध्ये वाहने न थांबता प्रवास करू शकतील आणि कापलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल. एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. याअंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच ८५ टोल नाक्यांवर लागू करण्यात आली असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ती देशभरात लागू करण्याची योजना आहे.
टोलचा खर्च वाचणार
नितीन गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. या नवीन प्रणालीमुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्याचा १२५-१५० रुपयांचा टोल सुमारे १५ रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्यांनी ३००० रुपयांच्या पासचाही उल्लेख केला, ज्यामुळे २०० टोल नाक्यांवरून प्रवास करणे शक्य होईल. दिल्ली-जयपूर, दिल्ली-डेहराडून, अमृतसर, कटरा आणि श्रीनगरसह अनेक महामार्ग कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्रात हायवेचे जाळे विस्तारणार
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन ‘हाय-स्पीड कॉरिडॉर्स’ (अतिजलद मार्गिका), ‘हाय-डेन्सिटी कॉरिडॉर्स’ (अति-वाहतूक घनता मार्गिका) आणि इतर महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतला. एका अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय राजधानीत आयोजित या आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी महामार्ग विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा-पदरीकरण, तळोदा-बऱ्हाणपूर टप्प्याचे चार-पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर आणि नागपूर-हैदराबाद कॉरिडॉर यांचा समावेश आहे.






