पालकांनी आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचे हे विचार मनात रुजवणे गरजेचे (फोटो सौजन्य - iStock)
शिवरायांचे हे विचार आपल्या पिढीत ठासून भरण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचे ५ अनमोल विचार हे शिकवायलाच हवेत. आयुष्याचे धडे गिरविण्यासाठी शिवरायांचे हे विचार नक्कीच त्यांना उपयोगी ठरतील. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कथा या प्रेरणादायीच आहेत. केवळ कथाच नाहीत तर त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल हे अगदी आजच्या काळातही आपल्यासाठी योग्य दिशा देणारे ठरते. आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी शिवरायांचे कोणते विचार माहीत करून घ्यायला हवेत नक्की जाणून घ्या
१. “छोट्या ध्येयाकडे टाकलेले एक छोटेसे पाऊल नंतर एका मोठ्या ध्येयाच्या प्राप्तीकडे नेऊ शकते.” – छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले आणि त्यासाठी त्यांनी मावळे जमविण्यापासून सुरूवात केली. सुरूवातीला एक एक गड सर करत त्यांनी आपल्या जनतेचा विश्वास संपादन केला आणि संपूर्ण मुलखावर राज्य केले. इतकंच नाही तर देशभरात त्यांनी मुघलांना मात देत विविध ठिकाणी गडकिल्ले सर केल्याच्या कथा आहेत.
आपल्या मुलांना शिवरायांच्या कथा शिकवताना त्याचे सार शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. मोठं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी सुरूवात ही लहान पावलं टाकतच करायला हवी तरच तुमचं मोठं ध्येय तुम्हाला प्राप्त करता येऊ शकतं. प्रत्येक पालकांनी मुलांना हे शिकवणं अत्यंत गरजेचे आहे.
२. “जेव्हा ध्येय साध्य करण्याची जिद्द असते तेव्हा डोंगरही धुळीच्या ढिगाऱ्यासारखा वाटतो.” – छत्रपती शिवाजी महाराज
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट साध्य करायची असते तेव्हा आधीच हा डोंगर कसा काय पार करणार हा विचार करण्यापेक्षा जिद्द ठेवणे गरजेचे आहे. जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट सहज पार होऊ शकते हाच विचार शिवबांनी नेहमीच आपल्या मावळ्यांमध्ये पसरवला आणि हाच विचार प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना द्यायला हवा. कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेच काम कठीण वाटत नाही. मात्र त्यासाठी सकारात्मकता आणि जिद्द या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत.
३. “शत्रूला कमी लेखू नका आणि त्याला खूप बलवान समजून घाबरू नका.” – छत्रपती शिवाजी महाराज
कोणत्याही शत्रूला कमी लेखणे योग्य नाही. कमी लेखल्यास आपण हरू शकतो आणि जरी शत्रू बलाढ्य असेल तरीही आपण त्याच्यासमोर नांगी टाकण्यापेक्षा त्याला कसे हरवू शकतो आणि शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ ठरू शकते हीच शिकवण शिवरायांच्या कथांमधून आपल्याला मिळते आणि हेच कथांमधून आपल्या मुलांपर्यंत पालकांनी पोहचवायला हवे. कोणताही शत्रू हा कधीच आपल्यापेक्षा कमी असत नाही आणि बलाढ्य असला तरी त्याला हरवता येते असंही नाही हीच शिकवण कायम महाराजांनी आपल्या वागण्यातून दिली आहे.
४. “जेव्हा विजय हे ध्येय असते, तेव्हा कितीही प्रयत्न किंवा किंमत मोजावी लागली तरी ती मोजायलाच हवी.” – छत्रपती शिवाजी महाराज
कोणत्याही लढाईत विजय हेच आपले ध्येय असते आणि त्यावेळी आपण शर्थीने प्रयत्न करायला हवेत हेच शिवाजी महाराजांनी कायम शिकवले आहे. इतकंच नाही तर तो विजय मिळविण्यासाठी जीवाचे रान करावे लागले तरीही चालेल अथवा कोणत्याही पद्धतीने त्याची किंमत चुकवावी लागली तरीही चालेल, पण ध्येय योग्य असेल आणि विजय हवा असेल तर त्यासाठी ते करण्याची तयारी ही असायलाच हवी. जेव्हा आपण योग्य गोष्टीसाठी लढत असतो तेव्हा त्यागाची तयारीही तितकीच लागते हीच शिकवण शिवबांनी आपल्या आचरणातून कायम दिली आणि त्यांचा हा सुविचार नक्कीच सध्याच्या पिढीला प्रेरणादायी ठरतोय.
५. “जो माणूस काळाच्या प्रकोपातही आपल्या कामाला समर्पित राहतो, त्याच्यासाठी काळ स्वतः बदलतो.” – छत्रपती शिवाजी महाराज
नशिबावर अवलंबून न राहता कर्म करण्यावर खरंतर विश्वास हवा. श्रीकृष्णानेही हेच सत्य सांगितले होते आणि शिवरायांनीही आपल्या कामातून कायम हेच सिद्ध केले आहे. कोणत्याही काळामध्ये जेव्हा आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असतो आणि कामाला समर्पित असतो तेव्हा काळ हा आपल्यासाठी नक्कीच बदलतो. केवळ नशीबावर अवलंबून न राहता कायम काळ बदलण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवावी हीच शिकवण कायम महाराजांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे अत्युच्च विचार नेहमीच येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारे आहेत. शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपल्या मुलांना पालकांनी या विचारांची शिकवण द्यावी आणि अधिकाधिक सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी तयार रहावे!






