‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळींचा उच्चार होताच मनात एक अभिमानाची भावना निर्माण होते. मराठी आपली मायबोली, जन्मापासूनच आपण या भाषेशी जोडले जातो आणि ही भाषाही सहज आपल्याला आपलीशी करते. राज्यच्या प्रत्येक जागी मराठीचा गोडवा बदलत जातो मात्र भाषा तिचं राहते. आज ज्या गर्वाने आपण आपल्याला मराठी बोलवून घेतो, तो मराठी शब्द नक्की कुठून आला?आपल्या मराठी भाषेचं वय नेमकं किती असेल? असे प्रश्न कधी तुमच्या मनात आलेत का? मुळात महाराष्ट्राची राज्यभाषा असणाऱ्या या मराठी भाषेला मराठी हे नाव कसे प्राप्त झाले आणि त्यामागचा इतिहास याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
आठव्या शतकाच्या शेवटी लिहिल्या गेलेल्या ‘कुवलयमाला कथा’ नावाच्या ग्रंथात जवळपास 18 देशी भाषांचा उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येते. त्या भाषांमध्ये ‘मरहट्ट’ नावाचीही एक भाषा आढळून येते. मरहट्ट जनसमुदाय आणि त्यांच्या भाषेच्या वर्णनासाठी ‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कळहसीले य दिण्णले गहिल्ले उल्लाविरे तत्थ मरहट्टे’ असे लिहिण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या उदयाची गोष्ट 859 मध्ये घेऊन जाते. जिथे ‘धर्मोपदेशमाला’ ग्रांथमध्येही ‘मरहट्ट’ भाषेचा उल्लेख असल्याचे आढळून येते. हे सर्व उल्लेख बघता मराठी भाषेला प्राचीन काळात ‘मरहट्ट’ म्हटले जात असावे, असे प्रचित होते. मराठी भाषेच्या नावाचा उल्लेख यादवकालीन साहित्यामध्येही करण्यात आला जिथं या भाषेसाठी ‘मऱ्हाटी’ असा शब्द वापरला गेल्याचे दिसून येते. मऱ्हाटीसोबतच त्या काळात मराठी भाषेसाठी असणारं दुसरं नाव म्हणजे ‘देशी’. महानुभव पंथांचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा उल्लेख अशाच प्रकारे असल्याचे दिसून येते.
हेदेखील वाचा – 3 वर्षे रात्रंदिवस काम करत राहिले 9 हजार मजूर तरीही हिटलरच्या आलिशान हॉटेलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही…
काळ पुढे गेला आणि मऱ्हाटीचे बहुविध उच्चार केले जाऊ लागले. पुढे ‘ऱ्ह’ शेवटच्या ‘टी’ला जोडला जाऊ लागला आणि त्यातूनच उदयास आलेला शब्द ठरला ‘मराठी’. मराठी भाषेच्या आणि त्याहूनही या भाषेला मराठी हे नाव मिळण्यामागेही अनेक संदर्भ आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मराठी हा शब्द महाराष्ट्र या शब्दाच्या अपभ्रंशातुनही आल्याचे काहींचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशातील एरण येथे सुमारे इ.स. चौथ्या शतकातील शिलालेख सापडला होता. त्यात सर्वप्रथम ‘महाराष्ट्र’ या नावाचा उल्लेख आढळला होता. हा शिलालेख शक राजा श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग याने युद्धात मरण पावलेल्या नाग लोकांच्या स्मरणार्थ उभारला होता. विशेष म्हणजे या लेखात सत्यनाग याने तो ‘माहाराष्ट्र’ म्हणजे महाराष्ट्रचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. यावरूनच प्राचीन महाराषट्रात नाग लोकांची वस्ती होती असे मानले जाते.