कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारीच असणारी दोन दुकानं रविवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास आगीत बेचिराख झाली. शेजारीच विद्युत खांब असल्यामुळे शॉर्टसर्किटने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत दोन दुकानदारांचे साधारण 30 हजाराचे नुकसान झाले आहे.पाट तिठ्यावर लक्ष्मण गोलतकर यांचे इस्त्रीचे दुकान होते. इस्त्रीसाठी आजूबाजूच्या परिसरातून आलेले कपडे त्यांनी आपल्या लाकडी कपाटात बंदिस्त ठेवले होते. ते जळून खाक झाले.
मध्यरात्री 3.30 च्या दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकाला ही आग निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर कुडाळ एमआयडीसीमधील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अथक प्रयत्ननी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. या आगीची झळ शेजारीच असणाऱ्या रवींद्र गोसावी यांच्या जनरल स्टोअर्सला बसली. या घटनेचा पंचनामा झालेला नाही. परिस्थिती बेताचीच असताना आगीच्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे दुकान मालक मात्र हतबल झाले आहेत.
दुकानाशेजारीच महावितरणचा वीज खांब असून त्याच्या डीपीही उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. दिवसा जर ही घटना घडली असती तर मोठा प्रसंग निर्माण होण्याची भीती होती. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
मागील काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगी लागून शेती, दुकाने यांचे नुकसान झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने काजू आणि आंबा बागायतीत आगी लागल्या असून लाखो रुपयांचे उत्पन्न नष्ट झाले आहे. मालवण, वेंगुर्ले तालुक्यात या घटना घडल्यात. यात दुपारच्या वेळी जंगलात वणवे पेटून ते बागायतीपर्यंत येतात. तर कणकवली बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री हॉटेल, किराणा माल दुकानाला शार्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.