मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा! विद्याविहार, मानखुर्द हे दोन महत्त्वाचे मोठे उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यावर भर
मुंबईतील वाहतूककोंडीतून दिलासा देण्यासाठी, महापालिकेने विद्याविहार आणि मानखुर्द महाराष्ट्र नगर या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांचे बांधकाम गतिमान करण्याचा सतत वाढणाऱ्या निर्णय घेतला आहे. विद्याविहार उड्डाणपूल ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत, तर मानखुर्द-महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाचे दोन्ही भाग ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुदतीचे पालन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे, तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. बांगर यांनी शनिवारी सकाळी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळांना भेट देऊन कामाचा आढावा घेत कामाला गती देण्याचे निर्देश दिले.(फोटो सौजन्य – AI)
प्रकल्पस्थळी कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सक्त निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मानखुर्द – महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमितपणे सकाळी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
प्रस्तावित आराखड्यानुसार, आर्म-१ हा १,४२० मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा २ लेनचा मार्ग असेल, तर आर्म-२ हा दुसऱ्या स्तरावरील १,९५१ मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा २ लेनचा उड्डाणपूल असेल. या दोन्ही पुलांमुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष सुरू झालेल्या या प्रकल्पाचे सद्यस्थितीला सुमारे ३३ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाहणी दरम्यान बांगर यांनी प्रकल्पाच्या आड येणाऱ्या महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचीही पाहणी केली.
अतिरिक्त आयुक्तांनी विद्याविहार पूल प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या या एकूण ६५० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम आतापर्यंत सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून, हे काम ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटरचा मुख्य पूल, पूर्व बाजूला २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटरचा पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. तसेच या पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग दिला जात आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर पूर्व व पश्चिम पोहोच रस्त्यांवर भविष्यात कोणतीही वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पालिकेच्या ‘एन’ विभागाचे अधिकारी, उद्यान विभाग आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधून सुनियोजन करण्याचे आदेश बांगर यांनी दिले. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीस अडथळा ठरणारी ठिकाणे, पदपथ, झाडे व इतर आस्थापनांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.






