Baramati Politics: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं
विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार आणि पवार कुटुंबीयांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, यामध्ये राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर खलबते झाल्याची चर्चा आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर पार्थ पवार की जय पवार यांची निवड करायची, तसेच अजित पवारांच्या स्मारकाबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते.
याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवरही या बैठकीत खल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या अंत्यविधीच्या ठिकाणाची पाहणी देखील केली. या बैठकीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, बारामतीतील या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या रिक्त पदांवर आता घरातील सदस्यांची वर्णी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी भूषवलेल्या विविध महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्ष आणि संचालक पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अजित पवार हे माळेगाव साखर कारखाना, विद्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, रयत शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांचे नेतृत्व करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही महत्त्वाची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत. तर पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, याकडे राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या पवार कुटुंब आणि विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या माळेगाव साखर कारखाना, विद्या प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा संस्थांच्या जबाबदाऱ्या कुटुंबात वाटून घेतल्या जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. मात्र, पार्थ पवार यांना दोन वर्षांच्या उर्वरित कालावधीऐवजी ६ वर्षांच्या पूर्ण टर्म असलेल्या जागेवर राज्यसभेवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे.
बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवरही चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्याकडे काही महत्त्वाची पदे सोपवून पार्थ आणि जय पवार यांच्याकडे युवा नेतृत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.






