उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा 'अॅक्शन प्लॅन' (Photo Credit- X)
महापौर समीर राजूरकर यांनी पदभार सांभाळताच दुसऱ्या दिवशी चिकलठाणा ते सिडको दरम्यान पाणी वितरणातील अडीअडचणी समजून घेतल्या. पाणी वितरणात असलेल्या त्रुटींची माहिती घेतली. त्यानंतर शहरातील पाण्याचा गॅप करण्यासाठी बैठक बोलावण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मंगळवारी महापौर यांच्या दालनात पाण्याचा गॅप करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीस महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत, पाणी पुरवठा विभागाचे समन्वयक ए. बी. देशमुख, के. एम. फालक, कार्यकारी अभियंता वसंत भोये, अनिल तनपूरे, किरण धांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
महापौर समीर राजूरकर यांनी उन्हाळा तोंडावर आलेला आहे. शहरातील पाणी वितरण अद्यापही सुरळीत झालेले नाही. अनेक भागाला आठ दिवसाआड तर काही भागाला दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली. या पाइपलाइनमधून ७५ एमएलडी पाणी मिळणार आहे. परंतु, या पाइपलाइनमधून २५ एमएलडी पाणी येत आहे. ७५ एमएलडी पाणी कधी मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, ९०० च्या पाइपलाइनमधून ७५ एमएलडी पाणी मिळण्यासाठी फारोळा येथे त्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून २५ एमएलडी आणले जात आहे.
शहराला पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करताना नगरसेवकानी दबाव टाकून आधी या भागाला पाणी सोडा, असे म्हणत पाण्याचे वेळापत्रक बदलू नये, अशी विनंती आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी नगरसेवकांनी मदत करावी. २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सविस्तर आराखड्यामध्ये गळती, ट्रान्सफार्मर जळण्याची शक्यता गृहीत धरूनच आराखडा तयार करावा अशा सूचना आयुक्त जी. श्रीकांत यांनी केल्या.
शहरातील पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. शहराचा गैप कमी करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु, अनेक नगरसेवक नो-नेटवर्क भागाला पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा आग्रह करीत आहे. जोपर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत नो-नेटवर्क भागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगरसेवकांनी नो-नेटवर्क भागाला पाणी देण्याचा आग्रह धरू नये, या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याचे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.






