महिला आरक्षणावरून काँग्रेसची केंद्रावर टीका; ‘८५०’ आकड्याचा आधार काय?
छाजेड म्हणाले, “लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र ‘८५०’ हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.”
ते म्हणाले की, महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला असून राहुल गांधी यांनीही यासाठी संघर्ष केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचा दावा त्यांनी केला.
२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी २०२९ नंतर करण्याचा प्रस्ताव असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी शंका व्यक्त केली. “जनगणना प्रक्रियेचा आधार देत अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. ती वेळेत पूर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
भाजप सरकारवर टीका करताना छाजेड यांनी महिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचा आरोप केला. “महागाई, आर्थिक अडचणी आणि इतर धोरणांचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. तसेच शेती आणि कामगार क्षेत्रातील निर्णयही घाईघाईने घेतले जात आहेत,” असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, महिला आरक्षण हा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.






