अतिवृष्टीने आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात (Photo Credit : Team Navrashtra)
अकोला : गेल्या दोन दिवसांत अकोल्यात मुसळधार पाऊस झाला. यात अतिवृष्टीने 41 हजार 886 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. सध्या जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट असून, 82 घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तिघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय; मुंबई, ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज तर पुण्यात…
यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात अनेकदा 10 पेक्षा जास्त मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, कापूस, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. सोमवारी (दि. 2) झालेल्या अतिवृष्टीने नुकसानात भर घातली आहे. या नुकसानीचा प्राथमिक पाहणीचा अहवाल मंगळवारी (दि. 3) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने विभागीय कृषी संचालकांना पाठविला. त्यानुसार, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 82 घरांचे अंशतः नुकसान झाले तर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना कंपनीकडे तक्रार करावी लागणार आहे. प्रशासनानेही नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पावसामुळे सर्व पिकांची वाढ खुंटल्याने उत्पन्नातही मोठी घट येणार आहे. परिणामी, शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तेल्हारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सात मंडळांत अतिवृष्टी
अकोला तालुक्यातील दहीहंडा मंडळात 84.30 मिमी पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस मंडळात 69.80 मिमी, बार्शिटाकळी तालुक्यातील महान मंडळात 65.30 मिमी, पातूर तालुक्यातील पातूर मंडळात 83.50 मिमी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर मंडळात 83.80 मिमी, लाखपुरी मंडळात 76.80 मिमी, माना मंडळात 78.30 मिमी पाऊस झाला आहे.
हेदेखील वाचा : गुजरातपेक्षा महाराष्ट्रच ठरला सरस! फडणवीसांनी जाहीर केला परकीय गुंतवणूकीचा अहवाल






