अजित पवार विमान अपघाताच्या माळरानावर कागदपत्रांचा खच पडला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Ajit Pawar Passed Away : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात एका माळरानावर झाला. या माळरानावर कागदपत्रांचा खच पडल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या सभा व बैठका होणार होत्या. यामुळे आपली सर्व कामे उरकून अजित पवार हे सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा : “माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा बारामती विमानतळाच्या दोन ते तीन किलोमीटर आधी झाला आहे. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. एका माळरानावर विमान कोसळले असून आजूबाजूला ऊस शेती आणि माळरान आहे. या अपघातावेळी भीषण स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यामध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाले. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिली आहेत. माळरानावर सर्वत्र कागदपत्रे आणि फाईलचा खच पडलेला दिसून आला.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी
सोशल मीडियावर अपघाताच्या झालेल्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अजित पवार हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समाजपयोगी कामे करत असल्याचे दिसून आले आहे. दुर्घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे पडली आहेत. यामुळे समाजाच्या कामाचा माणूस गेला अशी लोकभावना समोर येत आहे. अजित पवार यांच्याकडे समाजाच्या तळागळातील माणसे कामासाठी येत असतं. आणि सर्वांची कामे मोठ्या तप्तरतेने करणे हे अजित पवारांचे वैशिष्ट होते. त्यामुळे लोकनेता हरपल्याची भावना जनमाणसातून येत आहे.






