जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर तामलवाडी (ता. तुळजापूर) शिवारात कार्यरत असलेल्या बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी लातूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना याबाबत सोमवारी २ फेब्रुवारी रोजी लेखी पत्र पाठविले आहे.
२० जानेवारी रोजी दैनिक ‘नवराष्ट्र’ने बालाजी अमाईन्स कारखान्यातून होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाबाबत वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली होती. या वृत्तानंतर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. हवेत दुर्गंधी, रसायनयुक्त पाणी शेतात सोडले जात असल्याचा संशय, तसेच जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही परिणाम होण्याची भीती आहे. रासायनिक प्रदूषणामुळे त्वचारोग, श्वसनाचे विकार व अन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही जाणकारांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा परिसर जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होऊ शकतात. राष्ट्रीय महामार्गा लगतच हा रासायनिक कारखाना असल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही याचा गंभीर धोका असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बालाजी अमाईन्स ही रासायनिक कंपनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत असल्यास तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हा कारखाना लोकवस्तीपासून दूर अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या सर्व तक्रारींची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी संबंधित प्रकरणात प्रचलित अधिनियम, नियम, शासन निर्णय, न्यायालयीन आदेश व शासन परिपत्रकांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या तपासणी अहवालावरून कारखान्याने प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले आहेत की नाही, हे स्पष्ट होणार आहे. नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाई, उत्पादन बंदी किंवा स्थलांतरासारखे कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतात. त्यामुळे बालाजी अमाईन्स प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर किती ठोस आणि पारदर्शक कारवाई करते, याकडे नागरिक बारकाईने पाहत आहेत.






