अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव
उमरखेड महागाव तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कंदसड, करपा रोगाचा प्रादुर्भाव तसेच हवामानातील बदल यामुळे उत्पादकतेवर विपरित परिणाम झाला आहे. यासोबतच निविष्ठांची वाढती महागाई, मजुरीच्या दरातील मोठी वाढ आणि गतवर्षीच्या तुलनेत घटलेले बाजारभाव यामुळे हळद पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत असून त्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका बसत आहे. गादी वाफा (बेड) लागवड, ठिबक सिंचन, विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे काही प्रमाणात उत्पादनात वाढ झाली होती. तसेच लागवड ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेत यांत्रिकीकरण झाल्याने मजुरी खर्च काहीसा कमी झाला होता.(फोटो सौजन्य – istock)
मात्र यंदा मजुरांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. साधारणपणे हळदीची सरासरी उत्पादकता एकरी २५ ते ३० क्विंटल असते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे ती घटून सुमारे १५ ते २० क्विंटलपर्यंत आली आहे. २०२५ च्या डिसेंबर अखेरपासून हळदीचे दर १७ ते १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते, मात्र उत्पादन घट आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. २०२४ च्या तुलनेत लागवडीत वाढ झाली असली, तरी अतिवृष्टीमुळे कंदसड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. सध्या काढणी हंगाम सुरू असून मजुरांच्या अभावामुळे सुमारे ७० टक्के हळदीची काढणी अद्याप बाकी आहे. काढणी केलेल्या हळदीवर शिजवणी, वाळवणी व चकाकी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हळद लागवडीसाठी घरचे बी असेल तर एकरी सुमारे ६० हजार रुपये, तर विकतचे बी घेतल्यास ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. यंदा काढणी व शिजवणीच्या मजुरी दरात दुपटीने वाढ झाली असून बाजारभाव मात्र पाच ते सहा हजार रुपयांनी घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वर्षानुवर्षे त्याच जमिनीचा सातत्याने वापर, सेलम वाणाच्या शुद्ध बियाण्यांचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर व अपुरी उपलब्धता तसेच पीक फेरपालट न केल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने कदसडीचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व घटकांचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असून अनेक भागात उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग…
मारोती कोत्तेवार, हळद उत्पादक, विडुळ, तीन एकरांवरील हळदीची काढणी पूर्ण झाली असून एकरी सरासरी क्विटलप्रमाणे सुमारे ४५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे कंदसड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली आहे, काढणीसाठी मजुरी दरात दुपटीने वाढ झाली असून त्याउलट बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्याऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून वसमत येथील हरीद्रा’ हळद संशोधन केंद्राने रोगप्रतिकारक व उच्च उत्पादकतेचे वाण विकसित करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. सध्या परिसरात उत्पादनात सरासरी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याने यंदा हळद लागवड कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






