संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळवून देणाऱ्या भामा-आसखेड योजनेला दोन वर्षांचा विलंब झाला आहे. ज्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केली, त्यालाच पुन्हा काम देण्याच्या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. १६७ एमएलडी क्षमतेच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असूनही, केवळ ३-४ ठिकाणच्या ठप्प कामामुळे योजना रखडली आहे. नवीन निविदा प्रक्रियेत वेळ जाईल, असे समर्थन प्रशासनाकडून दिले जात असले, तरी दोन वर्षे वेळ घालवणाऱ्या ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम पुन्हा सुरू करण्याचा दावा केला जात असला तरी, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पुन्हा संधी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी आहे.
प्रशासनाची दुटप्पी भूमिका?
भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी त्याला हटवून नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात, ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प आहे. असे असतानाही, आता त्याच ठेकेदाराला पुन्हा संधी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, ३ ते ४ महत्त्वाच्या ठिकाणचे काम पूर्णपणे ठप्प असल्याने संपूर्ण योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असतानाही ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे कामाचा वेग मंदावल्याचे समोर आले आहे.
परस्परविरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी
कामातील त्रुटी आणि विलंबासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याचे काम काढून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता नवीन निविदा प्रक्रियेत जास्त वेळ जाईल, असे कारण पुढे करत त्याच ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्याची भूमिका घेतली जात आहे. एकीकडे कामात कसूर केल्याचे मान्य करायचे आणि दुसरीकडे त्याच ठेकेदाराला झुकते माप द्यायचे, या परस्परविरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नव्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता
नुकतीच या कामाची पाहणी करण्यात आली असून, काम पुन्हा गतीने सुरू होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले हे काम संबंधित ठेकेदार पुढील सात महिन्यांत खरोखर पूर्ण करेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भामा-आसखेडसारखा मोठा प्रकल्प पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वारंवार होणारा विलंब आणि दोषी ठेकेदारालाच पुन्हा पायघड्या घालण्याच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण प्रकल्पाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामात चूक करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार की त्यांना अभय मिळणार, याकडे आता पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्प क्षमता : १६७ एमएलडी पाणी पुरवठा.
स्थिती : ७० टक्के काम पूर्ण, ३-४ ठिकाणी काम ठप्प.
विंलब : नियोजित वेळेपेक्षा तब्बल २ वर्षे उशीर.
विवाद : बडतर्फ ठेकेदाराला पुन्हा काम देण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट.






