डीएमटीच्या एसी बसेस बंद; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना नाहक त्रास
निष्काळजीपणाचा कळस असलेले प्रशासन आणि बेजबाबदार कंत्राटदार यांच्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. केडीएमटीकडून एसी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती.मात्र हे फक्त एक फसवं आश्वासन असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एसी बसेसची सेवा आता मिळणार नसल्याने प्रवाशांनी खंत व्यक्त केली आहे.
डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटीला मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत अपयश येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशनअंतर्गत तब्बल ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून २०७ इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदीचा करणार असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं.
कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून 207 इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी 99 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून केडीएमटीने मे कॉसीस मोबलिटी सर्व्हिसेस आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा 207 बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमताच नसल्याने पहिल्या 10 बसेस बनवतानाच कंपनीला कठीण वाटायला लागलं. पुढील बसेस तयार करण्यास असमर्थता दाखवत कंपनीने कशाबशा 8 बसेस अडीच वर्षाचा विलंब लावत सेवेत आणल्या.
कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला, पण त्यांची तितकी निर्मिती क्षमता नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे .
मोखाडा पोलीसांची धडक कारवाई; सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक
जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार, प्रवाशांना गारेगार सेवा मिळणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते . पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली . केडीएमटीच्या ताफ्यातकेवळ ८ बस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या. त्यापैकी ४ बस काही महिन्यांतच बंद पडल्या आणि उर्वरित ४ बस विमा नुतनीकरणाच्या फेऱ्यात अडकून शेवटी आगारात उभ्या आहेत.आता सुटे भाग मिळत नाही, विमा भरलेला नाही, बस थांबल्या आहेत अशी कारणे सांगत जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते.
याबाबत केडीएमसीच्या परिवहन विभागाकडून मात्र
“एसी बस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवल्या जात असून बस पासिंग, विमा, पीयूसी यासारख्या गोष्टीची पूर्तता त्यानेच करायची असून विमा पॉलिसी नूतनीकरण करून घेण्याबाबत त्याला कळविण्यात आले आहे. लवकरच नुतनीकरण करून या बसेस रस्त्यावर उतरतील” असं केडीएमटी व्यवस्थापकांनी सांगितले आहे.