मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे काढण्यात येतो आहे. त्यात दोन मतप्रवाह आहेत. शरद पवार यांनी राजानीमा देऊन पक्षातून बाहेर जाण्याची इच्छा असणाऱ्यांना एक मेसेज दिला, असं सांगण्यात येतंयं. तर दुसऱ्या मतप्रवाहात पवारांच्या राजीनाम्यामुळं राष्ट्रवादी भाजपासोबत (NCP with BJP) जाण्याचा मार्ग अधिक सोपा झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख असताना त्यांना भाजपासारख्या धर्मांध पक्षासोबत जाणं अशक्य होतं. यातून पवारांच्या ५६ वर्षांच्या राजकीय जीवनातील धर्मनिरपेक्ष नेत्याची प्रतिमा आड येत होती. पुरोगामी राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार राज्यात भाजपासोबत गेले असले तर त्यावरुन त्यांच्यावर आणि पक्षावर टीका झाली असती. ही टीका त्यांना राजकीय दृष्ट्या महागात पडण्याची शक्यता होती. आता पवार पदापासून दूर झाल्यानं आगामी काळात राष्ट्रवादी घेत असलेल्या निर्णयापासून दूर राहण्याची मुभा शरद पवारांना मिळणार आहे.
काय आहे शरद पवारांच्या मनात?
सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा निकाल येत्या आठवड्यात अपेक्षित आहे. या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले, तर राज्यातील शिंदे-फडमवीस सरकार गडगडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची किंवा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. सद्यस्थितीत कोणत्याही पक्षाला राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय करु शकतो.
उद्धव ठाकरेंची सहमती
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ भेट झाली होती. या भेटीत राष्ट्रवादी सत्तेसाठी भाजपासोबत जाऊ शकते, याची कल्पना उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस भआजपासोबत गेली तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शिंदे गटाला नामोहरम करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. कसेही करुन शिंदे गटाची नामुष्की व्हावी, ही इच्छा असल्यानं या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही सहमती दर्शवली असल्याचं सांगण्यात येतंय.
विधानसभेच्या जागावाटपातही अडचण राहणार नाही
2024 विधानसभा निवडणुकांसाठी मविआ एकत्र लढण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरुन तिन्ही पक्षांत मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 125 पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र ठाकरे गटाला अत्यंत कमी जागा यात मिळणार आहेत. अशा स्थितीत काँग्रेसचाही या जागावाटपाला विरोध असेल. थोडक्यात जागावाटपावरुन आघाडीत बिघाडीच होण्याची शक्यता जास्त असल्याचं मानण्यात येतंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वीच आघाडी तोडून राष्ट्रवादीनं भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं मानण्यात येतंय. लोकसभा भाजपासोबत आणि विधानसभेत स्वतंत्र लढण्याचा पवारांचा मानस असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पवारांचा राजीनामा अनपेक्षित न्वहता, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. असे समजण्यास वाव आहे.
सत्तेत आल्यास निवडणुकांसाठी लाभ
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून हा पक्ष काही अपवाद वगळता सातत्यानं सत्तेत राहिलेला आहे. त्यासाठी प्रसंगी मविआचा प्रयोगही पवारांनी केलेला आहे. आता राज्यात दीड वर्ष पुन्हा सत्ता मिळत असेल, तर भाजपासोबत जाण्याची त्यांची तयारी असल्याचं सांगण्यात येतंय. दीड वर्ष सत्तेत राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला लाभ होण्याची शक्यता अधिक आहे. सत्तेत आल्यानं कार्यकर्ते आणि पक्षालाही त्याचा लाभ होणार आहे.
भाजपासोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी
भाजपासोबत जाण्याच्या या चर्चा पक्षाच्या पातळीवरही चर्चिला गेल्या आहेत. राज्यातील आणि मुंबईतील प्रमुख पदाधिककाऱ्यांशी संघटनात्मक पातळीवर मतंही जाणून घेण्यात आलेली आहेत. त्यात अनेकांनी भाजपात जाण्यास नकार दिला असला तरी सत्तेसाठी युती किंवा आघाडी करण्यास होकार दिल्याची माहिती आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर पक्षाला आणि नेत्यांनाही याचा आनंदच होणार आहे.
पवारांची राष्ट्रीय राजकारणातील प्रतिमा अबाधित
शरद पवार हे पक्षाध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादी भाजपासोबत गेली, तरी शरद पवारांची राष्ट्रीय पातळीवर असलेली भाजपाविरोधी प्रतिमा कायम राहणार आहे. त्यामुळे केंद्राच्या पातळीवरच शरद पवारांचं वेगळं राजकारण म्हणजेच भाजपाविरोधी राजकीय पक्षांसोबत राहण्याचं राजकारण करता येणं शक्य होणार आहे. दुसरीकडं राज्यात मात्र भाजपासोबत सत्तेत जाण्याचा पर्याय अधिक खुला झाला आहे.






