कोल्हापुरातील 'पिंक व्हिलेज'; डोंगरदऱ्यातील शेळकेवाडी आले जगाच्या नकाशावर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं छोटसं गाव शेळकेवाडी. गावची लोकसंख्या जेमतेम हजाराच्या घरात. लोकसंख्या कमी असल्याने ग्रामपंचायतीला दोन ते तीन लाखांच्या आकड्यातच महसूलही मिळायचा. केवळ १०० घरांचं गाव असल्यामुळे राजकीय नेत्यांचाही या वाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र, ग्रामस्थांनी गावाचा कायापालट करायचं ठरवलं. त्यानंतर २००४ पासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये गावाचा समावेश होत गेला.
Mumbai News : अक्षय्य तृतीयेला मुंबईत १४०१ घरांची विक्री, २४ तासांत सरकारला मिळाले इतके कोटी रुपये
राज्यस्तरीय कोणत्याही स्पर्धेत शेळकेवाडी पहिल्या क्रमांकावर राहिली. बक्षिसांच्या मिळालेल्या रकमेतून गावात हागणदारीमुक्त मोहिम राबविण्यात आली. तर, बायोगॅस प्रकल्प राबवणारं आणि १०० टक्के सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावची एकजूट दर्शवणारा गुलाबी रंग सर्व घरांना देण्यात आल्यामुळे ‘पिंक व्हिलेज’ म्हणूनही या गावाचा गौरव होत आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या माध्यमातून जिल्हयात पहिलं १०० टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे. शेळकेवाडी ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या मदतीतून सौरऊर्जेचा प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यातील पहिलं सौरऊर्जेवरील गाव होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरातून सोलर सिस्टिमसाठी लागणा-या ६७ हजारांपैकी केवळ ५ हजार रुपये घेण्यात आले.
मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतूनगावाला सौरऊर्जेत स्वयंपूर्ण करण्यासाठी सोलरसाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं वाटा उचलला, गावातील कुटुंबांची एकूण संख्या १०२ आहे. १ कि. व्हॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ६७ हजार ६०० इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लाभार्थ्यांना ३० हजारांचं अनुदान मिळतं. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा ५ हजार आहे. या योजनेसाठी ल्हा परिषदेकडून १४ हजार ३०० रुपये मिळतात, तर ग्रामपंचायतीकडून १९ हजार ३०० रुपये दिले जातात.
विविध शासकीय योजनांमध्ये घेतलेल्या सहभागातून मिळालेल्या रक्कमेच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाचा पाच हजारांचा हिस्सा ग्रामपंचायतीनं भरला, गावातील १०० घरांमध्ये १ कि. व्हॅट प्रकल्प बसविण्यात आले. तर २ घरांत २ कि. व्हॅट प्रकल्प बसविण्यात आले. विशेष म्हणजे नावीन्यपूर्णमधून सोलस्साठी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना यांना विशेष निधी सुद्धा मिळवण्यात ग्रामपंचायत शेळकेवाडीला यश मिळाले आहे.
गावानं आज अखेर १०० टक्के बायोगॅसला जोडणारी शौचालय बांधली आहेत. सर्व ओला कचरा गॅससाठी टाकला जातो. सर्वांच्या परसबागा आहेत. सांडपाणी व्यवस्थापन शेतीसाठी केलं जातं. सांडपाणी वाहून नेऊन ते मोठ्या शोष खड्चात सोडलं जातं. शोषखनुधाच्या आजूबाजूला केळीची लागवड करण्यात आली आहे. संपूर्ण गावातील गटारी बंदिस्त आहेत. लोकसहभागातून गावात बंधारा बांधला आहे. गावातील सुका कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अवनी संस्थेमार्फत केलं जातं. विद्युत उपकरणं वापरूनही शून्य लाईट बिल येत असल्यामुळे गावातील महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केला.
सर्वेक्षणासाठी गावात येणार टीम गावातील महसूल उत्पन्न कमी असल्यामुळं यंदाही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये गावानं सहभाग नोंदवला आहे. येत्या काही दिवसात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची टीम सर्वेक्षणासाठी शेळकेवाडीत येणार आहे.
एकीकडं देशभरात सिमेंट, विटांच्या जंगलात शहर भकास होत असताना शेळकेवाडी पर्यावरण पूरक गावाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करणारं गाव म्हणून या गावानं बहुमान मिळवला आहे. शिवाय प्रत्येक घर गुलाबी बनवत संपूर्ण महाराष्ट्राला एकतेचा संदेश देखील दिला आहे. केंद्र, राज्य सरकारच्या मदतीतून आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं गावाचा कायापालट होऊ शकतो, असं भक्कम उदाहरण शेळकेवाडीच्या निमित्तानं पुन्हा पुढे आले आहे.