Shaktipeeth Mahamarga News: विकास की विनाशाचा महामार्ग? शक्तीपीठ प्रकल्पावरून डॉ. परुळेकर आक्रमक
डॉ. परुळेकर यांनी सरकारला थेट सवाल केला आहे की, या महामार्गासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जनतेने किंवा शेतकरी संघटनेने साधी विनंती किंवा निवेदन दिलेले नाही. मग कोणाच्या फायद्यासाठी हा एक लाख दहा हजार कोटींचा घाट घातला जात आहे? विदर्भ आणि कोकणाला जोडण्यासाठी आधीच ‘नागपूर-रत्नागिरी’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना, त्याच मार्गाला समांतर असा नवा महामार्ग कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे, ती गावे निसर्गसंपन्न आणि वन्यजीवांनी समृद्ध आहेत. विशेष म्हणजे: प्रस्तावित आराखड्यातील सहा गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ क्षेत्रात येतात. दोडामार्ग तालुक्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीवर बंदी आहे. १०० मीटर रुंदीच्या पट्ट्यासाठी हजारो झाडांची कत्तल झाल्यास पर्यावरणाचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवून हा कसला विकास साधला जात आहे? असा सवाल डॉ. परुळेकर यांनी विचारला आहे.
या महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही ‘एक्झिट’ प्रस्तावित नाही. १८ तासांचा प्रवास ८ तासांवर आणण्याच्या नादात १२० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या पाहण्यापलीकडे स्थानिक ग्रामस्थांच्या हाती काहीही लागणार नाही. उलट, १०० मीटर रुंदीचे महाकाय भराव घातल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटतील आणि पावसाळ्यात शेतीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन छोट्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल.
महामार्गामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होऊन विस्थापन होईल. यामुळे आधीच गव्यांच्या त्रासाने त्रस्त असलेला शेतकरी अधिकच संकटात येईल. आता गवेरेडे थेट शेतकऱ्यांच्या अंगणात येतील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, असे डॉ. परुळेकर यांनी नमूद केले.
पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱ्यांना ‘समाजविघातक प्रवृत्ती’ म्हणण्यापर्यंत पालकमंत्र्यांची मजल गेली आहे. यावरून या प्रकल्पासाठी त्यांच्यावर वरिष्ठांचा किती मोठा दबाव आहे, हे स्पष्ट होते. रेणुका माता, तुळजाभवानी आणि अंबाबाई यांसारख्या श्रद्धास्थानांचे नाव पुढे करून केवळ आर्थिक लाभासाठी निसर्गाचा बळी देणाऱ्यांना देवी पावेल काय? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.






