सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतूर/मनोहर हिंगणे : गेल्या काही दिवसांपासून ओतुर आणि परिसरात वरुणराजाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये जरी आनंदाचे वातावरण असले, तरी ओतुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकाला मात्र या पावसाने अक्षरशः ‘पाणलोट क्षेत्रा’चे स्वरूप आणले आहे. ओतूर बस स्थानक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने संपूर्ण आगार चिखलमय झाले असून, तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी सुटली असून, डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनियासारख्या भयंकर रोगराईची भीती स्थानिक व्यावसायिकांना आणि नागरिकांना सतावत आहे. ‘स्मार्ट’ सेवांचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाचा अनागोंदी आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ओतुर हे जुन्नर तालुक्यातील तसेच परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य वाहतूक केंद्र (जंक्शन) समजले जाते. येथून पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कल्याण यांसारख्या प्रमुख शहरांसाठी दररोज शेकडो बसेस धावतात. हजारो प्रवाशांची अहोरात्र वर्दळ असणाऱ्या या बस स्थानकाची अवस्था सध्या एखाद्या डबक्यासारखी झाली आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा किंवा गटारे नसल्यामुळे, संपूर्ण पाणी स्थानक परिसराच्या आवारातच साचून राहिले आहे. बसेसच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे या साचलेल्या पाण्याचा आता काळाकुट्ट चिखल झाला आहे. या चिखलातून आणि घाण पाण्यातून वाट काढत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे, जे अत्यंत संतापजनक आहे. या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना बसत आहे. ओतुर परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कपडे आणि दप्तर सांभाळत, चिखलातून घसरत विद्यार्थ्यांना बस पकडावी लागत आहे. अनेकदा पाय घसरून विद्यार्थी या घाण पाण्यात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
तसेच वृद्ध प्रवाशांना आणि महिलांना तर या बस स्थानकात पाऊल ठेवणेही कठीण झाले आहे. बस लागल्यानंतर जागेसाठी होणाऱ्या पळापळीत, साचलेल्या पाण्याच्या चिखलाचे उडणारे कारंजे प्रवाशांच्या अंगावर उडत असून, त्यांचे कपडे खराब होत आहेत. “आम्ही प्रवासाचे पूर्ण भाडे देतो, मग महामंडळ आम्हाला नरक यातना का देत आहे?” असा संतप्त सवाल महिला प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक दुकानदारांना आर्थिक फटका
बस स्थानक परिसरात आणि गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या स्थानिक दुकानदारांना या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. स्थानकात साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे, ज्यामुळे ग्राहक दुकानांकडे फिरकेनासे झाले आहेत. “स्थानकात पाणी साचल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, दुकानात दिवसभर बसणे अशक्य झाले आहे. आमच्या आरोग्याचा तर प्रश्न आहेच, पण ग्राहक येत नसल्याने आमचे व्यवसाय देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. महामंडळाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक व्यवसायिकांनी दिली.
हे सुद्धा वाचा : सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत
बस स्थानकाचा कारभार रामभरोसे
ओतुर बस स्थानकाचा हा कारभार पूर्णपणे रामभरोसे चालला असल्याचे दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी पूर्वतयारी करणे आवश्यक होते, ती का करण्यात आली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी एसटी महामंडळाकडे त्वरित लेखी आणि तोंडी स्वरूपात ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. स्थानकातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यात यावा, चिखल साफ करून तिथे खडी अथवा मुरूम टाकण्यात यावा आणि जंतुनाशक फवारणी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. जर प्रशासनाने पुढील दोन दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर ओतुरकर आणि प्रवासी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.






