
Maharashtra Breaking News Updates Today:
01 May 2026 08:27 AM (IST)
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या दरांबाबत मोठे संकट निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. सुरुवातीला गॅस दर वाढणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते, मात्र आता देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आजपासून व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे व्यावसायिक सिलिंडरचे दर जवळपास 3 हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. निवडणुका संपल्यानंतर पश्चिम बंगाल, आसामसह काही राज्यांमध्ये ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक वर्गाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे.
01 May 2026 08:22 AM (IST)
राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव तीव्र झाला असून विदर्भ परिसर सर्वाधिक तापलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाला आहे.
Vidarbha मधील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे सरासरी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर नागपूर, वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही तापमानात वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
तीव्र उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. मात्र पुढील 48 तासांत तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
01 May 2026 08:17 AM (IST)
Indian Premier League स्पर्धेच्या यशानंतर देशभरात टी-20 क्रिकेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून विविध राज्यांमध्ये स्थानिक लीग स्पर्धांचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रात Maharashtra Cricket Association कडून एमपीएल स्पर्धा आयोजित केली जाते, तर आता मध्य प्रदेशमध्ये महिला टी-20 लीगची तयारी सुरू झाली आहे.
Madhya Pradesh Cricket League स्पर्धेसाठी ग्वाल्हेर येथील इम्पीरियल गोल्फ रिसॉर्टमध्ये टीम ड्राफ्ट उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला बोर्ड अध्यक्ष महाआर्यमन सिंधिया, माजी क्रिकेटपटू Shikhar Dhawan आणि Saba Karim प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात शिखर धवन यांनी लीगच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर सबा करीम यांनी माधवराव सिंधिया यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाची आठवण जागवली. या नव्या महिला लीगमुळे राज्यातील क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
01 May 2026 08:12 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा पराभवानंतर वांद्रे पूर्वमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
दरम्यान, अनेक इच्छुकांमधून सिद्दीकी यांची निवड झाल्यानंतर पक्षात नाराजीची कुजबुज सुरू झाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी उमेदवारी नाकारताना पक्षाने साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत सूचक विधान करत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.
01 May 2026 08:05 AM (IST)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी (३० एप्रिल) महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने गोकुळवर प्रशासक नेमण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत असून, मुदतवाढ नाकारल्यामुळे संघाच्या कारभारावर प्रशासक नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्यांनी पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
01 May 2026 08:00 AM (IST)
आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पंजाबमध्ये राजकीय सूडनाट्य सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले राजिंदर गुप्ता यांच्यावर पंजाब सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. राजिंदर गुप्ता यांच्या मालकीच्या 'ट्रायडंट ग्रुप'च्या धौला येथील कारखान्यावर पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज मोठा छापा टाकला. प्रदूषण विभागाच्या नऊ वाहनांचा ताफा आणि नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक कारखान्यात दाखल होत तपासणी सुरू केली आहे.
पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. २०२६ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
निकालाच्या दिवशी सकाळी ११ वाजता शिक्षण मंडळाची अधिकृत पत्रकार परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्याचा एकूण निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव अर्जातील नोंदीप्रमाणे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. यासोबतच इतर काही अधिकृत पोर्टलवरही निकालाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाची परीक्षा दिलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सोयही उपलब्ध असेल.