Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची तिरपी चाल, नाट्यमय घडामोडी अन् अभिजीत पवारांची माघार
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे विधानपरिषदेसाठी महायुतीकडून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. दोघांमध्ये थेट लढत होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण अचानक अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार होती. या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी त्या दोघांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. “मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे”, असं अभिजीत पवारांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे आता रवींद्र फाटक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुरुवातीला भाजप आणि शिंदे गटात ठाण्याच्या या जागेवरून काही प्रमाणात रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर पक्षाने रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीत कोणतीही बंडखोरी झाली नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही कोणताही मजबूत पर्यायी उमेदवार रिंगणात उतरला नाही.
राजकीय वर्तुळात काही अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत कोणत्याही अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अभिजित पवार यांच्या माघारीनंतर रवींद्र फाटक हेच एकमेव उमेदवार उरल्याने आता त्यांचा बिनविरोध विजय निश्चित मानला जात आहे. या घडामोडीमुळे महायुतीने ठाणे मतदारसंघातील अंतर्गत मतभेद टाळण्यात यश मिळवल्याचे मानले जात आहे.
रवींद्र फाटक यांची ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत राजकीय पकड मानली जाते. शिवसेनेतील संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेमुळे त्यांनी या भागात स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून रवींद्र फाटक यांची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पक्षाकडून संधी देण्यात आली होती. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.






