File Photo : Students
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली.
जिल्हाधिकारी दयानिधी यांना प्राप्त अधिकारान्वये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.२६) सुट्टी जाहीर केली आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.