सौजन्य - सोशल मिडीया
सोलापूर : विविध घटनामुळं सध्या बीड जिल्हा चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सर्वांनाच माहित आहे. अशातच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणारे गोविंद फड यांची फेसबुक वरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशी पोस्ट गोविंद फड फेसबुकवर पोस्ट केली आहे. गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
जरांगे पाटील म्हणाले, मी माझ्या समाजाला देव माय- बाप मानलं आहे. माझी संपत्ती तुम्ही आहे मी आयुष्यात एक रुपया कमविला नाही, माझे मायबाप तुम्ही आहात. मी पण डावावर लागलो. माझे कुटुंब पण डावावर लागलंय. कधी मारून टाकतील मला आणि माझ्या कुटूंबाला तरी मी हटत नाही. मी रात्रंदिवस बाहेर आहे. कोणाला यायचे त्याला येऊ द्या, आम्ही समर्थ आहे. तू कोणत्याही गावात ये राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे. फक्त तू ये. धमक्या देऊ नको. यावं करणार आहे त्याव करणारं, या धमक्या नको देऊ. काल कुणीतरी म्हणालं, ते धनंजय मुंडे याचं कुणीतरी ते म्हणाले भंडारा लावून मारून टाकतो. तू भंडारा लाव नाहीतर गुलाल काहीही लाव. मी मरायला भीत नाही. माझी कधीपण तयारी आहे. माझा समाज पण सज्ज आहे, असा इशारा त्यांनी फड यांना दिला. का मारायचं तर गरिबांच काम करतो हेच कारण ना. समाजाने एकजुटीने रहा, खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या क्षेत्रात अडचणी आहेत त्या क्षेत्रात सुध्दा मी एक यंत्रणा उभा करायला लागलोय. मी समाजाला सांगितलेले आहे. चार पाच दिवसानंतर राज्यभरातील एक वर्षासाठी दौरे पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्हाला आरक्षण दिलंय, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टेंशन नाही. तुम्हाला आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याही कोनाकोपर्यात अडचण आली तर 15 मिनिटात माणूस तुमच्या मदतीला आला पाहिजे.
शेतकर्यांचं कर्ज माफ करतो
मी एकदा मुद्दा घेतला की आपण एकदा माग लागलो की पाणी काढूस्तोवर माग सरकत नाही मग जे व्हायचं असतो असू दे. शेतकरी म्हणून आंदोलनात उतरा. शेतकर्यांनी सुध्दा पुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये गटतट नसले पाहिजेत, तरच त्यांना न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठेवत नाही. या पवित्र व्यासपीठावरुन आजच शब्द देतो, तुमचं कर्ज ठेवत नाही, तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसे काय मिळत नाही ते बघतो, तुमच्या दुधाला कसा भाव मिळत नाही ते पण आपल्याकडे लागलं. तुम्ही फक्त टेंशन नाही घ्यायचे.
सगेसोयऱ्याचा विषय लवकरच निकाली
ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मोर्चा घेऊन गेलो होतो वाशीला तिथे सांगितले सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत तीन चार महिने लागणार आहेत तोपर्यंत आपण मराठ्यांच्या पोरींना मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना तर हो फक्त मराठ्याच्याच पोरीला मोफत शिक्षण हवे अशी मागणी केली असती. मी त्यावेळी सांगितले सगळ्या जातीच्या लेकीबाळीना मोफत शिक्षण करा आणि तो जीआर मंजूर करून घेतला. आता आरक्षणाचा पश्चिम महाराष्ट्राचा नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यत काय तरी खालीवर करतील, नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे सांगितले आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.






