फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात एका विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.) रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात आरोपींनी शेतातील घरात घुसून दाम्पत्याला चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत लुटमार केली. त्यानंतर पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा पती दुधलगाव येथील शेतातील घरात झोपलेले असताना शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आरोपींपैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. दोघांनी दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि ६०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी घरात सोन्या-चांदीचे दागिने असल्याची विचारणा केली. दागिने नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी दाम्पत्याला जबरदस्तीने जवळील शेतात नेले.
शेतात गेल्यानंतर एका आरोपीने पतीला विळ्याचा धाक दाखवत रोखून ठेवले, तर दुसऱ्या आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे दिली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेनंतर पीडित महिलेने मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचार, दरोडा, घरफोडी, धमकी आणि इतर संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले असून, आरोपींचा माग काढण्यासाठी विविध तांत्रिक माध्यमांचाही वापर केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात किंवा शेतघरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांनीही नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.






