भारतीय हवामानशास्त्र विभाग : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिस (INCOIS) या संस्थेच्या विद्यमानाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 4 मे रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे रविवार, दि. 5 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांमध्ये समुद्रात भरतीच्या (High tide) वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची (swell surge waves) शक्यता वर्तविली आहे. समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांची उंची सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होणार आहे. परिणामी, येत्या 36 तासांमध्ये नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रकिनारी जाण्याचे टाळावे. सर्व यंत्रंणानी सतर्क राहवे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटाचा इशारा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व साहाय्यक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवासी असलेल्या नागरिकांनीदेखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मच्छीमार बाधवांना प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना
समुद्रावर उसळणाऱ्या लाटांमुळे मच्छीमार बाधवांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या बोटी सुरक्षित अंतरावर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून समुद्रावर उसळणाऱ्या लाटांमुळे बोटी एकमेंकावर धडकून नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात जाऊ नये. तसेच, समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.