मस्जीद बंदरमध्ये लोकलमधून पडून 1 ठार तर 3 जखमी (Photo Credit - X)
Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या अनियंत्रित गर्दीमुळे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गर्दीच्या फटक्यात ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते, 3 पुरुष आणि 1 महिला ट्रॅकवरुन चालत असताना अचानक लोकल मागून आली, त्यात त्यांना धडक बसली. या अपघातात तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या या जखमी प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आज सायंकाळी ५:३० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनात मोटरमनसह इतर रेल्वे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून कल्याणच्या (Kalyan) दिशेने एकही लोकल धावलेली नाही, परिणामी CSMT सह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
आंदोलनाचे मुख्य कारण: अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
या आंदोलनाचे मूळ कारण जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या लोकल दुर्घटनेत आहे. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्यांवर निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. जलद लोकलच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे. आपल्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.






