"शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार...", किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोन्याचा पाळणा जोजवण्यात आला आणि पुष्पवृष्टी करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. यावेळ, ज्या विचारांवर आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते. अशी ग्वाही नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण किल्ले शिवनेरीवर झाले. या भाषणातून सुनेत्रा पवार यांनी महामानवांच्या पुरोगामी विचारांचा वारसा अजित पवार यांनी जपला त्याच वाटेवर या पुढे वाटचाल करणार असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सत्तेत असला तरी अजित पवार यांनी विचारधारेशी कोणतीही तडजोड केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि भूमिका ते नेहमी ठामपणे मांडत असत. त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी देखील शिवजयंती कार्यक्रमाच्या पहिल्या वहिल्या भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचे भाषण झाले. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, पुरोगामी विचारांशी बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत अजित पवार यांनी महायुतीत सत्तेत असलो तरी विचारांशी कोणतीही तडजोड नाही, हे अनेकदा विचार आणि कृतीतून दाखवून दिले होते. आता अजित पवार नंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाऱधारेची दिशा कोणती असेल हे सुनेत्रा पवार यांनी अधोरेखीत केले आहे. ज्या कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे सुत्रे आली आहेत, अशा कठीण काळात देखील त्या सत्तेतील त्यांची भूमिका आणि पक्षाची विचारधारा ठामपणे पुढे नेतील अशी सुचक भूमिका त्यांच्या भाषणातून दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.






