प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता 'कॅश' चालणार नाही (Photo Credit- X)
NHAI च्या नवीन धोरणानुसार, १ एप्रिल २०२६ पासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. सध्या महामार्गांवर FASTag चा वापर ९८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. या यशामुळे आता संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. ज्या प्रवाशांकडे FASTag मध्ये बॅलन्स नसेल, त्यांना UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) द्वारे पेमेंट करण्याचा पर्याय दिला जाईल. या निर्णयामुळे टोल प्लाझावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि चिल्लर पैशांवरून होणारे वाद आता कायमचे संपुष्टात येणार आहेत.
टोल नाक्यांवर रोख व्यवहारांमुळे विशेषतः ‘पीक आवर्स’मध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे इंधन आणि वेळ या दोन्हीचा अपव्यय होतो. NHAI च्या अंदाजानुसार, पूर्णपणे डिजिटल व्यवस्था लागू केल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. देशभरातील १,१५० हून अधिक टोल प्लाझावर प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येईल. यामुळे महामार्गावरील सरासरी वेग वाढण्यास मदत होणार आहे.
सध्याच्या नियमांनुसार, ज्या वाहनांवर वैध FASTag नाही, त्यांना रोख रक्कम भरल्यास टोलच्या दुप्पट रक्कम मोजावी लागते. तसेच, UPI द्वारे पेमेंट केल्यास वाहन श्रेणीनुसार १.२५ पट शुल्क आकारले जाते. मात्र, १ एप्रिलपासून रोख व्यवहाराचा पर्यायच काढून टाकला जाणार असल्याने प्रवाशांना डिजिटल पेमेंटशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
केंद्र सरकारचा हा निर्णय केवळ पारदर्शकता आणण्यासाठी नसून पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठीही आहे. इंधनाची बचत आणि कमी झालेली कागदपत्रांची गरज यामुळे पर्यावरणालाही फायदा होईल. त्यामुळे आता हायवेवर निघण्यापूर्वी तुमच्या FASTag मध्ये पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये UPI ॲप सज्ज ठेवा. अन्यथा, टोल नाक्यावर तुमचा प्रवास खोळंबू शकतो.
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?






